अध्याय चोविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, सरूपता आणि सायुज्यता यात एक मूलभूत फरक आहे. सरूपता प्राप्त झालेला भक्त जरी तंतोतंत माझ्यासारखा दिसत असला तरी त्याचा स्वभाव माझ्यासारखा असेलच असे नाही. ज्याप्रमाणे दोन जुळे भाऊ दिसायला एकसारखे असले तरी त्यांचे स्वभाव भिन्न असू शकतात. त्याप्रमाणे माझ्या आणि भक्ताच्या दिसण्यात एकसारखेपणा असला तरी स्वभावात फरक असू शकतो. म्हणून सरूपतेपेक्षा सायुज्यता महत्त्वाची आहे हे भक्त जाणतात.
म्हणून अभेदभावाने जे माझे भजन करतात, त्यांना सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. जे राजा आणि रंक, वंद्य आणि निंद्य असा भेद मानत नाहीत, त्यांना सायुज्यता प्राप्त होते. जो ही देहबुद्धी मिथ्या समजतो, त्यालाच सायुज्यता प्राप्त होते. छाया ही आपल्याचपासून जन्मास येऊन आपल्याबरोबरच वाढते, तरी ती माझी आहे अशी तिच्याबद्दल आपुलकी, काही कोणाच्या मनात उत्पन्न होत नाही. अशाच प्रकारे देहाचे दुःख ज्याला बाधत नाही, त्याला निश्चितपणे सायुज्यता प्राप्त होते. देहाची विषयासक्ती सोडून जो मनोभावाने अभेदभक्ती करतो, त्यालाच उद्धवा! सायुज्य मुक्ती प्राप्त होते, असे निश्चित समज. स्वतःच्या देहामध्ये ज्याला मीपणा उत्पन्न होत नाही, कोणत्याही प्राणिमात्रामध्ये जो तू पणा पाहात नाही. त्याला सर्वस्वी पूर्ण सायुज्यमुक्ती प्राप्त होते. उद्धवा! माझ्या आत्म्याचा जेवढा विस्तार आहे, तेवढीच त्याला आत्मप्रचीती असते.
यामुळे त्यालाच सहज सायुज्य मुक्ती लाभते. त्याला आपला देह विष्णुस्वरूप व्हावा असा देहाभिमान मुळीच उत्पन्न होत नाही. त्याला विष्णूचा देह आणि आपला देह हे दोन्ही मिथ्या असेच वाटत असते. म्हणून तो सरूपतेची इच्छा करीत नाही. आपल्याच ठिकाणी आपण विचार करून पाहिला असता देह म्हणून जितका आहे, तितका मिथ्या आहे असे वाटते. तेव्हा तेथे सारूप्यता राहिली कोठे? अर्थात ज्ञात्यांनी ती कशी मागावी? सायुज्यता प्राप्त झाली की, ब्रह्माशिवाय रिकामी जागाच शिल्लक राहिलेली दिसत नाही. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी एकात्मता होणे, याचंच नाव सायुज्यता होय.
अनेक प्रकारच्या स्वरूपांनी जग भरून राहिले आहे, ते सारे आपलेच अंग आहे असे जो समजतो, आपणच अभंग असा सर्वात्मा आहे असा ज्याचा भाव असतो. त्यालाच पूर्ण सायुज्यता प्राप्त होते. अंतर्बाह्य व्यापलेला एक मीच, सर्व स्थावर-जंगांमध्ये व्यापलेला एक मीच, चराचरातील आत्मा तो मीच, असे जो मानतो, त्याच्या घरी सायुज्यता राबत असते असे समज.
सर्वत्र एकटा एक मीच एकपणाने भरून राहिलो आहे अशी ज्याची समजूत असते, ज्याला द्वैताचा दुष्काळ पडलेला असतो म्हणजे ज्याचा द्वैतभाव नष्ट झालेला असतो, तोच खरोखर सायुज्यता पावतो. तात्पर्य, भावार्थाच्या अत्यंत प्रेमाने माझे भक्त ज्याची ज्याची इच्छा करतात, ते ते मी श्रीपती त्यांना पुरवितो. याप्रमाणे भक्तांना चारही मुक्ती प्राप्त होतात. जिज्ञासु, अर्थार्थी या कल्पना लक्षात न घेता ते थोर भक्त निरंतर निरिच्छपणाने व अत्यंत प्रेमाने माझे भजन करतात, ते सलोकता, समीपता व सरूपता मुळीच घेत नाहीत व शेवटी सायुज्यताही मागत नाहीत. ते निरिच्छपणाने भगवंताला भजत असतात. ह्याचंच नाव खरी भक्ती.
भजन हे मोठे सामर्थ्यवान असते. या सामर्थ्यचा एक मोठा चमत्कार असा की, आवडीनेच अधिकाधिक आवड उत्पन्न होते आणि अधिकाधिक उत्कर्षाने क्षणोक्षणी प्रेमाची नित्य नवी गोडी उत्पन्न होते. खरोखर माझ्या आवडीने तो आपले जीवित सर्वस्वी खर्च करतो, तरी त्याच्या चित्तात कधी बदल होत नाही. भावबळाने भजनावर त्याचा इतका विश्वास असतो की, त्याशिवाय माझी भक्ती करण्यासाठी इतर काही करावे असे त्याच्या मनातसुद्धा येत नाही. देवाधिदेव काय तो एक मीच, सर्व प्राणिमात्रांमध्ये माझाच आत्मा आहे, अशी जी त्याची समजूत झालेली असते. त्या समजुतीत कितीही विकल्प, विकृती, संशय उत्पन्न करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी सुद्धा ते उत्पन्न होत नाहीत.
क्रमशः