नागपूर येथील साहित्यिक विजया मारोतकर यांचे प्रतिपाद : साहित्यलेणी प्रतिष्ठानतर्फे ’पोरी जरा जपून’ कार्यक्रम
वार्ताहर /पणजी
मुली सुशिक्षित जरी झाल्या तरी त्यांचे प्रश्न वाढत आहेत. अगदी पाच वर्षाच्या मुलीपासून ते अगदी ऐंशी वयाच्या महिलेवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. सकाळी घराबाहेर गेलेली मुलगी संध्याकाळी सुरक्षितरीत्या घरी परत येईल याची शाश्वती नसते. पौगंडावस्थेतील मुलामुलींकडे मोबाईल आल्यापासून त्यांच्यावर भरोसा राहिला नाही. प्रेम आंधळं असतंच परंतु त्याच्या गोड बोलण्याला फशी पडून केव्हा घात होईल याचा पत्तादेखील तिला लागत नाही. तोवर ती आपले सर्वस्व देऊन बसते, असे प्रतिपादन नागपूर येथील साहित्यिक विजयाताई मारोतकर यांनी केले. साहित्यलेणी प्रतिष्ठान ताळगाव, ताळगाव ग्रामपंचायत आणि मनसा क्रिएशन्स पणजी या संस्थातर्फे आयोजित ’पोरी जरा जपून’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक तथा पत्रकार राजू भिकारो नाईक होते. प्रमुख पाहुण्या म्हणून मनसा क्रिएशन्सच्या कालिका बापट होत्या. सरपंच जानू रोझारियो उद्घाटक होते. प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश तळावडेकर हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. मनसा क्रिएशन्सच्या कालिका बापट यांनी मनोगत व्यक्त केले. साहित्यलेणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा प्रकाश क्षीरसागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरपंच जानू रोझारियो यांनीही आपले विचार व्यक्त केले. आजकाल महिलांवर अत्याचार का होतो, याचा विचार महिलांनी करायला हवा. पूर्वी मुलीना सर्व प्रकारच्या कला शिकवल्या जात. चांगले संस्कार केले जात. कोणाशी कसं वागावं किती जवळ जावं हे शिकवल जायचं त्यामुळे मुली सुरक्षित होत्या. आताच्या काही महिला व मुली तोकडे कपडे का घालतात हा प्रश्न सर्वत्र उभा राहिलेला आहे. मातृत्व, ममत्व कमी होत असल्यामुळे आपुलकी, जिव्हाळा कमी होऊ लागला आहे. पर स्त्री ही आपली माता आनी बहीण, ही पवित्र आजच्या सो कोल्ड प्रागतिकतेच्या रेट्यात लोप पावत आहे. अशा अनेक गोष्टींमुळे आज मुलींचा, महिलांचा छळ होतो, असे राजू नाईक म्हणाले. यावेळी घेण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेत अनेकांनी भाग घेतला. कल्पना लोहार यांना प्रथम, शांता बिदिभावे यांना द्वितीय व साहिदा शेख यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. परीक्षक म्हणून निऊपा नाटेकर व अनिता परेरा यांना काम पाहिले. या कार्यक्रमाला सांताक्रूझ, म्हापसा, ताळगाव या ठिकाणाहून सुमारे 75 महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सुगंधा बोरकर, अनिता परेरा, या महिलांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.