पहाटेपासून लावत आहेत रांगा : केंद्र सरकारची अशी कोणतीच योजना नसल्याचे संबंधितांकडून स्पष्टीकरण
बेळगाव : राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेसोबतच केंद्र सरकारकडून प्रत्येक महिलेच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार अशी अफवा बेळगाव व खानापूर तालुक्यात पसरली आहे. यामुळे मागील महिन्याभरापासून पोस्ट कार्यालयांमध्ये खाते उघडण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 3000 रुपये जमा होणार, अशी अफवा पसरवली जात आहे. अशी कोणतीही योजना अद्याप केंद्र सरकारने जाहीर केलेली नसल्याने ही फेक न्यूज असल्याचे आता समोर येत आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने महिलांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ज्यांनी गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येक महिन्याला 2000 रुपये जमा केले जात आहेत. परंतु काही महिलांच्या खात्यात काही तांत्रिक कारणाने गृहलक्ष्मीची रक्कम जमा होत नसल्याची तक्रार केली जात होती. आधार कार्ड व बँक खाते यामधील माहितीत तफावत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. तर काहींचे केवायसी केले नसल्याने खात्यात पैसे जमा होत नाहीत. यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने पोस्ट खाते काढण्याची सूचना केली होती. यामुळे बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयासह इतर विभागीय कार्यालयांमध्ये खाते उघडले जात होते. या बरोबरच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींसाठी पोस्टात खाते उघडले जात होते. परंतु काही दिवसांपासून शहर तसेच ग्रामीण भागात अफवा पसरली आहे. राज्य सरकारसोबतच केंद्र सरकार 3000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात जमा करणार असल्याची अफवा उठविली जात आहे. यामुळे पोस्ट कार्यालयात खाते उघडण्यासाठी पहाटे 6 वाजल्यापासून महिलांच्या रांगा लागत आहेत.
पोस्टात दोन प्रकाराची खाती
पोस्ट कार्यालयात दोन प्रकारची खाती उघडली जात आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयबीपीएस) मध्ये केवळ आधारकार्ड व 200 रुपये स्वीकारून पोस्टमन ऑनलाईन बँक खाते उघडत आहे. तर पोस्ट कार्यालयात बचत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, दोन फोटो व 500 रुपये स्वीकारले जात आहेत. दोन्ही प्रकारची खाती काढली जात असल्याने महिलांमध्ये गोंधळ आहे.
रक्कम जमा होण्याची केवळ अफवाच
केंद्र सरकारकडून 3000 रुपये जमा केले जाणार असून यासाठी पोस्ट कार्यालयात खाते उघडणे आवश्यक आहे, अशी अफवा पसरली आहे. यामुळे काम सोडून महिला बँक खाते उघडण्यासाठी दिवसभर रांगांमध्ये उभ्या राहत आहेत. गृहलक्ष्मी योजनेची रक्कम ज्या महिलांच्या खात्यात जमा झाली आहे त्या महिलाही पोस्टामध्ये खाते उघडण्यासाठी धडपड करीत आहेत. आवश्यकता नसतानाही अपुऱ्या माहिती आधारे महिलांची धावपळ सुरू असल्याने यामध्ये पुरुष वर्गालाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्या महिलांच्या खात्यात गृहलक्ष्मीची रक्कम जमा होत आहे. त्यांनी अन्यत्र खाते उघडू नये, असे सांगण्यात येत आहे.