कामगार नेते केदारचंद बंसल यांचे प्रतिपादन : पणजीत भव्य रॅलीसह कामगार दिन साजरा
प्रतिनिधी /पणजी
कामगार हाच देशाचा खरा आधार आहे, तरीही कामगारांना दुलर्क्षित केले जाते. जगातील प्रत्येक वस्तू, इमारती घडविण्याचे काम कामगार करीत असतात. कामगार हा समाजातील प्रमुख घटक असून कामगाराने स्वतःला कमी लेखू नये, असे आवाहन केदारचंद बंसल यांनी केले आहे. कामगारांवर दुर्लक्ष केले जात आहे, हे जरी खरे असले तरी आपल्या हक्कांसाठी आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी कामगारांनी एकजूट राखणे नितांत गरजेचे आहे, असेही बंसल यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त काल रविवारी 1 मे रोजी अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस गोवा (आयटक) यांनी आयोजति केलेल्या सभेत केदार चंद बंसल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, ऍड. सुहास नाईक, आयटक गोवाचे अध्यक्ष प्रसन्न उत्तगी, ऍड. राजू मंगेशकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
रॅलीत दोन हजार कामगार
सुरुवातीस पणजी शहरातून भव्य रॅली काढल्यांनतर येथील चर्चजवळ सभेचे आयोजन करण्यात आले होते. कदंब बसस्थानकाजवळील क्रांति सर्कलपासून रॅलीची सुरुवात झाली होती. विविध कंपन्यांमध्ये काम करणारे सुमारे दोन हजार कामगार या रॅलीत सहभागी झाले होते.
कामगारांवर होतोय अन्याय
कामगार हाच देशाचा खरा आधार आहे, तरीपण कामगारांना दुलर्क्षित केले जाते. शासनाकडून तसेच भांडवालदारांकडून कामगारांवर मोठा अन्याय केला जातो. कामगारांच्या हक्काच्या प्रत्येक गोष्टी त्यांना रस्त्यावर उतरूनच मिळवाव्या लागतात. हे जरी सत्य असले तरी कामगारच श्रेष्ठ आहे, असेही बंसल यांनी सांगितले.
महागाईचा फटका कामगारांनाच : फोन्सेका
कामगारांच्या हितासाठी लढणारी आयटक ही देशातील पहिली संघटना आहे. सरकारी तसेच इतर विविध ठिकाणी काम करणारे गोव्यात लाखो कामगार आहेत. मात्र आयटकशी संबंधित असलेले काही मोजकेच कामगार आहेत. राज्यातील सगळे कामगार एका झेंडय़ाखाली आल्यास सरकारला किंवा भांडवलदाराला कामगारांच्या विरोधात कोणताही निर्णय घेण्याचे धाडस होणार नाही, असे कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले. आज महागाई गगनाला भिडली आहे, त्याचा फटका कामगारांना बसत आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी फोन्सेका यांनी केली आहे.
कामगारमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन
नवे कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी खात्याचा ताबा स्विकारल्यानंतर आयटकने बाबूश मोन्सेरात यांची भेट घेऊन त्यांना कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले आहे. कामगारांच्या सर्व मागण्यावर वेळीच तोडगा काढण्याचे आश्वासन मोन्सेरात यांनी दिले असल्याचे फोन्सेका यांनी सांगितले.
यावेळी ऍड. सुहास नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी आयटक गोव्यात करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. कामगारांना किमान 21 हजार रुपये वेतन देण्यात यावे, कामाची वेळ 6 तास करावी, कंत्राटी पद्धत बंद करावी, सध्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱया कामगारंना नोकरीत कायम करावे, अशा विविध मागण्या सुहास नाही यांनी मांडल्या.
राजू मंगेशकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रसन्ना उत्तगी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी केदारचंद बंसल यांचा शाल श्रीफळ, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करण्याचा ठराव
कदंब महामंडळ, नदी परिवहन खाते तसेच अन्य विविध सरकारी खात्यांमध्ये अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱया कामगारांना सरकारने त्वरित कायम करावे, असा ठराव यावेळी संमत करण्यात आला. सरकार जोपर्यंत या कामगारांना सेवेत कायम करीत नाही, तोपर्यंत या कामगारांना समान काम समान वेतन या धर्तीवर पगार मिळणार नाही. म्हणून कंत्राटी कामगारांनाही कायम कर्मचाऱयांप्रमाणेच पगार मिळावा, असाही ठराव संमत करण्यात आला.