वार्ताहर/उचगाव
शेती म्हणजे माती. या मातीचा कस चांगला असेल तरच त्यातून भरघोस पिके येतील. यासाठी शेतकरी वर्गाने रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय व गांडूळ खतांचा सातत्याने वापर करावा. आणि आपले आरोग्य जपावे, असा मौलिक सल्ला उचगाव रयत कृषी केंद्राचे प्रमुख कृषी अधिकारी सी. एस. नाईक यांनी दिला.
उचगाव येथील कृषी रयत केंद्र आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व भू-माता दिन उचगाव येथील रयत कृषी केंद्रामध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात सी. एस. नाईक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आपले विचार मांडले.
अडत व्यापारी नारायण पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे बाळू पाटील, भाग्यश्री पाटील व इतरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून भू-माता दिन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी बाळू पाटील यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व, सेंद्रिय खतांचा वापर केल्याने येणारी पिके व ती मानवाच्या आरोग्याला कशी उपयुक्त आहेत याबाबतची माहिती दिली. यावेळी अग्निअस्र, दर्शपर्णी अर्क, गांडूळ खत याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उचगाव रयत संपर्क केंद्राच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते. यामध्ये उचगाव, सावगाव, बिजगर्णी, आंबेवाडी, कुद्रेमनी, बाची, बेकिंनकेरे, सुळगा, कल्लेहोळ, आंबेवाडी, मण्णूर आदी गावातील शेतकऱ्यांनी यावेळी प्रश्न विचारले. भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले.