साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांचे मत, पहिले मुक्त साहित्य सृजन मराठी साहित्य संमेलन
वार्ताहर /पणजी
सर्जनशील कलाकारांच्या भोवती अनेक बंधनांचे ओझे असल्यामुळे साहित्याचे नुकसान होत आहे. एखादा लेखक वादाचा मुद्दा मांडत असेल तर त्याला सुडातून, धमक्मयातून उत्तर देणे अत्यंत वाईट गोष्ट आहे. मराठी साहित्याचे नुकसान अहंकारी समीक्षकांमुळे झाले आहे. साहित्य व्यवहाराची परिस्थिती बिकट झाली आहे. मुळात लेखकांने चांगला वाचक असणे व अधाशाप्रमाणे साहित्य वाचणे गरजेचे असते, असे मत प्रसिद्ध साहित्यकि डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.
मुक्त सृजन साहित्य पत्रिका औरंगाबाद, इन्स्टिटय़ूट मिनेझीस ब्रागांझा (आयएमबी), माधव राघव प्रकाशन व मनसा क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या मुक्त साहित्य सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदावरून डॉ. शोभणे बोलत होते. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माझी कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप, समीक्षक डॉ. यशपाल भिंगे, स्वागताध्यक्ष डॉ. मुरहरी केळे, कार्यवाह डॉ. महेश खरात, आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब, संयोजक डॉ. रामकिशन दहिफळे, डॉ. संतोष देशमुख, प्रिया धारूरकर, चित्रा क्षीरसागर, प्रिया कालिका बापट, सुनिता दशरथ परब उपस्थित होत्या.
ऍड. रमाकांत खलप, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दशरथ परब यांची यावेळी भाषणे झाली. महेश खरात यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात झाली. प्रकाश जडे यांनी ग्रंथदिंडीचे उद्घाटन केले. प्रदर्शनाचे उद्घाटन पद्माकर कुलकर्णी व सुनिता दशरथ परब यांच्या हस्ते झाले. वारणानगर येथील प्रीती शिंदे यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले. चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले. दरम्यान ‘आजचे शिक्षण वास्तव, अपेक्षा आणि साहित्यकांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात डॉ. लहू वाघमारे, डॉ. गणेश वेळंबे, डॉ. योगेश्री कोकरे, प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, डॉ. विष्णू पाटील यांनी भाग घेतला. संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.