संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचे प्रतिपादन : कारदगा रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
संजय अवघडी /माणकापूर
समाज सत्यापासून दूर जात आहे. पापसत्ता पुण्यसत्तेचा मुखवटा घेऊन फिरते आहे. पापसत्ता हे नरकाचे द्वार आहे. काही बनावट माध्यमे, खोटय़ा प्रतिमा, खोटे लेखक, सत्य न मानणारे, तुम्हाला आवश्यक ते देणारे आणि असत्य कथन करणारे लेखक, नेते, साहित्यिक, माध्यमांना रोखले पाहिजे. आताच्या लेखकांनी, साहित्यिकांनी सत्य बोलले पाहिजे, सत्य लिहिले पाहिजे, सत्य मांडले पाहिजे, सत्याला साक्षीची आवश्यकता असते. सत्य शपथेवर सांगावे लागते. सत्याचा आवाज सातत्यपूर्ण असतो. तो आवाज देण्याचे काम कारदगा साहित्य विकास मंडळ व येथील साहित्यप्रेमी मंडळींकडून होत आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कारदगा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक भारत सासणे यांनी केले. ते कारदगा साहित्य संमेलनाच्या रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
प्रारंभी कै. श्रेणिक पाटील साहित्य नगरीचे उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य विकास मंडळ न. नि. पटेल साहेब (आयएएस), व्यासपीठाचे उद्घाटन ज्ये÷ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते केले. संमेलनाचे उद्घाटन श्रीमंतराजे युवराज संभाजी छत्रपती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
याप्रसंगी आमदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार सुभाष जोशी, संमेलनाध्यक्ष भारत सासणे, ज्ये÷ साहित्यिक सुनील कुमार लवटे, चंद्रकुमार नलगे, युवा नेते उत्तम पाटील, ग्राम पंचायत अध्यक्ष राजू खिचडे, प्रदीप जाधव, अभिनंदन मुराबट्टे, अरविंद खराडे आदी उपस्थित होते. सरस्वती प्रतिमा पूजन दत्त कारखान्याचे व्हा. चेअरमन अरुण देसाई यांनी केले.
मराठी भाषा पोहोचली सर्व दूर
अध्यक्ष भारत सासणे पुढे बोलताना म्हणाले, मराठी भाषा महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. ती देश, विदेशातही पोचली आहे. आता विदेशातून मराठी भाषेत दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागले आहेत. मराठी भाषा सर्व दूर पोहोचली आहे. तिला बळ देण्याचे काम कारदगा साहित्य विकास मंडळाच्या माध्यमातून होत आहे.