भारत-चीन सीमेवरील सैनिकांशी संवाद ः सज्ज राहण्याचे आवाहन
बीजिंग / वृत्तसंस्था
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी भारत-चीन सीमेवरील चिनी सैनिकांशी संवाद साधला आहे. त्यांनी सैनिकांच्या तयारासंबंधीही चौकशी केली. सैनिकांना त्यांनी कोणत्याही स्थितीशी दोन हात करण्यासाठी पूर्णपणे सज्ज राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी चीनच्या लाल सेनेचे अधिकारी उपस्थित होते.
हिमालयीन प्रदेशात सध्या कडाक्याची थंडी आहे. अशा प्रतिकूल वातावरणात सीमाप्रदेशात नियुक्त करण्यात आलेल्या सैनिकांचा उत्साह आणि निर्धार वाढावा, यासाठी त्यांनी हा संवाद साधल्याचे तज्ञांचे मत आहे.
कारस्थानाचा संशय
चीनच्या अध्यक्षांनी अचानकपणे लडाख सीमेवरील चिनी सैनिकांशी संवाद साधल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चीनच्या मनात नेमके काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात असून चीन सीमेवर काही कारस्थान करत आहे, असा संशयही अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. चिनी अध्यक्षांनी हा संवाद व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून साधल्याचे स्पष्ट करण्यात आले.
चोवीस तास सतर्क रहा
जिनपिंग यांनी चीनच्या सैनिकांना सीमेवर चोवीस तास सतर्क आणि सावध राहण्याचा इशारा दिला. सध्या परिस्थितीत परिवर्तन होत आहे. केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. अशा स्थितीत सैनिकांनी देशाच्या धोरणानुसार सीमेवर सज्ज रहावे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी करावी, असा संदेश त्यांनी चीनचे सैनिक आणि त्यांचे अधिकारी यांना दिल्याचे समजते.
तणाव कायमच
भारत आणि चीन यांच्यात मार्च 2020 पासून लडाख सीमेवर तणाव आहे. जून 2020 मध्ये गलवान येथे झालेल्या भीषण संघर्षानंतर हा तणाव मोठय़ा प्रमाणात वाढला होता. या संघर्षात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तर चीनच्याही अनेक सैनिकांना कंठस्नान घालण्यात आले होते. मृत चिनी सैनिकांची नेमकी संख्या जाहीर करण्यात आलेली नव्हती. चीनने आपले चार सैनिक मारले गेल्याची कबुली नंतर दिली होती. मात्र, चीन खरी संख्या लपवत असल्याचा आरोपही झाला होता. काही विदेशी पत्रकारांच्या मते चीनचे 35 ते 40 सैनिक मारले गले होते. त्यानंतर पँगाँग भागातून दोन्ही देशांनी त्यांचे सैनिक मागे घेतले होते. डिसेंबर 2022 मध्ये अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागातही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक उडाली होती. 300 चिनी सैनिकांनी भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, सजग भारतीय सैनिकांनी हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत चिनी सैनिकांना पिटाळून लावले होते.