दिल्लीला पुराचा धोका : उत्तरेतील अन्य राज्यातही संततधार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या आठवड्यापासून उत्तर भारतातील उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये सतत पाऊस पडत आहे. या हाहाकारात गेल्या 4 दिवसात देशातील विविध राज्यांमध्ये 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 8 जुलैपासून हिमाचल प्रदेशमध्ये 36, उत्तर प्रदेशात 34, जम्मू-काश्मीरमध्ये 15, उत्तराखंडमध्ये 9, दिल्लीमध्ये 5 आणि राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. दिल्लीत पुराचा धोका वाढला असून संततधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
उत्तरेतील बहुतांश राज्यांमध्ये सध्या जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. हिमाचल wप्रदेशमध्ये 10,000 पर्यटक अडकले आहेत. चंद्रतालमध्ये 3 फूट बर्फ साचला आहे. बचावकार्यासाठी 6 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. कुल्लूमध्ये बियास नदीच्या प्रवाहात सेंज मार्केटचा अर्धा भागच वाहून गेला आहे.
उत्तराखंडमध्ये बुधवारी पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. भूस्खलनामुळे गंगोत्री आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद आहेत. येथे 3 ते 5 हजार लोक अडकल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांकडून मदत व बचावकार्य सुरू आहे.
दिल्लीतील यमुना नदीची पाणीपातळी बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 207.66 मीटरवर पोहोचली होती. यमुनेची सर्वोच्च जलपातळी 1978 मध्ये 207.49 मीटरवर पोहोचली होती. साहजिकच बुधवारी वाढलेल्या पाणीपातळीमुळे 45 वर्षांचा विक्रम मोडला गेला. दिल्लीतील अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून बुधवारी रात्रीपर्यंत यमुनेची पाण्याची पातळी 207.72 मीटरपर्यंत पोहोचेल, असे म्हटले आहे. केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केंद्राकडे मदतीची विनंती केली आहे. अन्य राज्यांमध्ये संततधार पाऊस सुरू असून बऱ्याच भागात पडझड, भूस्खलन, पूर आदी घटना घडल्याची नोंद झालेली आहे.