जीर्ण वीजखांब-तारा हटवून नवीन उभारणी करण्याची मागणी
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या व्याप्तीमधील पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेले विद्युत खांब तसेच त्यावरील विद्युत वाहिन्या धोकादायक बनल्या आहेत. याचबरोबर गावातील इतर ठिकाणचे जीर्ण झालेले खांब हटवून त्या ठिकाणी नवीन खांबांची उभारणी करावी, यासह इतर समस्या दूर करण्यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांनी निवेदन सादर केले आहे. येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिराच्या परिसरामध्ये उच्च दाबाच्या वीज वाहिन्या गेल्या आहेत. त्या धोकादायक स्थितीत आहेत. त्या ठिकाणी नवीन केबल घालण्याची व्यवस्था करावी. गावातील ट्रान्स्फॉर्मर जे धोकादायक स्थितीमध्ये आहेत, ते स्थलांतरित करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
समस्या दूर करण्याचे आश्वासन
विविध समस्यांसंदर्भात हेस्कॉमला अनेकवेळा निवेदने दिली आहेत. तरीही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी हे निवेदन देत आहोत. तेव्हा तातडीने पाऊल उचलावे, असे निवेदनात नमूद केले आहे. हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता नवीनकुमार यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम पाटील, मिलिंद पाटील उपस्थित होते.