कार्यवाहीसाठी जि. पं. सीईओंची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या तीन वर्षांखालील मुलांना पाळणा घर सुरू करण्याची संकल्पना राज्य सरकारने गेल्या अर्थसंकल्पात जाहीर केली होती. त्यानुसार जिल्हा पंचायतीकडून याच्या कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लवकरच रोजगार हमी योजनेतील कामांना चालना देण्याची तयारी चालविली आहे. नागरिक रोजगारासाठी स्थलांतरित होवू नयेत, आहे त्या ठिकाणीच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घर (कुसीनमने) योजना जाहीर केली होती. राज्यातील 4 हजार ग्राम पंचायतींच्या व्याप्तींमध्ये रोजगार हमी योजनेतून काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घर उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार याची मार्गसूची जिल्हा पंचायतीला जारी करण्यात आली आहे.
ग्राम पंचायतींनुसार सर्वेक्षण
ज्या ग्राम पंचायतींनी रोजगार हमीमध्ये अधिक मानव दिवस काम केले आहे अशा ग्राम पंचायतींमध्ये पाळणा घर उपलब्ध करून देण्याची सूचना सरकारने केली आहे. त्यानुसार जिल्हा पंचायतीकडून ग्राम पंचायतींनुसार सर्वेक्षण करून पाळणा घर उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पाळणा घरांची नोंद करून त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सेवा, सुविधा, मनुष्यबळ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या पाळणा घरांमध्ये येणाऱ्या मुलांसाठी नेमणूक करण्यात येणाऱ्या सेविकांना प्रशिक्षण देण्याची तयारीही जिल्हा पंचायतीकडून सुरू करण्यात आली आहे. लवकरच प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यात लवकरच रोजगार हमी योजनेतील कामांना प्रारंभ करून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने गतिमान हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला लवकरच रोजगार उपलब्ध होणार आहे. तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराचे दिवसही वाढविण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.