आमदार भास्करराव जाधव यांची शंभूराज देसाईंवर घणाघाती टीका
पाटणला शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंचांचा सत्कार
वार्ताहर/ पाटण
शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे हे आजारी असल्याचा फायदा घेत त्यांना गाफील ठेवत शंभूराज देसाई यांनी विश्वासघात केला. आज तोच विश्वासघात तुमच्या वाटय़ाला आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरला, उध्दवसाहेबांचं राज्य चोरलं आणि उध्दवसाहेबांचे वडील बाळासाहेबांचं नावही चोरलं. तुमच्या नावाचा इतिहास लिहिताना चोर म्हणून लिहिला जाईल, अशी घणाघाती टीका शिवसेना आमदार भास्करराव जाधव यांनी येथे बोलताना केली.
येथील रणजितसिंह पाटणकर स्मारक मंदिरात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. चिपळूणचे तालुकाप्रमुख संदीप सावंत, सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम, जिल्हा संघटक गजानन कदम, उपजिल्हा प्रमुख रवींद्र पाटील, पाटण तालुकाप्रमुख सुरेशनाना पाटील, सचिन आचरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार भास्करराव जाधव पुढे म्हणाले, देशातील सर्वात दीर्घकाळ चाललेला लढा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा आहे. भाजपाचे चंद्रकांतदादा आणि दुसरे म्हणजे सर्वच ठिकाणी पुढे पुढे करणारे शंभूराज हे दोघेही कर्नाटकला जातो म्हणाले होते. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिल्यावर दोघेही गार झाले. शंभूराज देसाई हिम्मत असेल तर कर्नाटकच्या सीमेवर जाऊन तिथल्या मराठी माणसाच्या पाठीमागे उभे राहून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना दम द्या. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यानंतर देसाई घराण्याला 37 वर्षानंतर मंत्रीपदाचा मान कोणी दिला असेल तर तो उध्दव ठाकरे यांनी दिला, असे शंभूराज देसाई तुम्ही म्हणाला होता. त्याच ठाकरेंच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. पण तुमचे आजोबा फार मोठे थोर होते, हे तुम्ही मात्र विसरलात. महाराष्ट्रात अनेक गृहमंत्री होऊन गेलेत. मात्र आज सर्वात दमदार गृहमंत्र्यांची आठवण केली तर ती कै. बाळासाहेब देसाईंच्या नावाचा उल्लेख आदराने केला जातो. मात्र त्यांचा नातू 37 वर्षानंतर विश्वासघात करतो हे जनतेने पाहिले आहे. आमदार शहाजीबापू त्यावेळी म्हणाले की, सगळ्यात आधी मी आणि शंभूराज देसाई मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेलो होतो, म्हणून चोरवाट दाखवणारे म्हणून तुमची गणना होईल.
बाळासाहेबांची शिवसेना नाव ऐकण्यापूर्वी शंभूराज देसाई तुम्ही धमक, हिम्मत दाखवायला पाहिजे होती. तुम्ही एकनाथरावांना सांगायला पाहिजे होते. बाळासाहेबांचं नाव द्यायचं असेल तर माझे आजोबा बाळासाहेब देसाई यांच्या नावाची शिवसेना असा नामकरण सोहळा करा तरच तुम्ही त्यांचे नातू शोभला असता, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. उध्दव साहेबांचे वडील चोरायचे कारण काय? म्हणून यापुढे शंभूराजेंचं सारखंसारखं नाव घेऊ नका. जेव्हा कधी विधानसभेची निवडणूक येईल, त्यावेळी कोणत्याही उमेदवाराला उभे करा लोक शंभूराज देसाईंना माती चारल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका आमदार जाधव यांनी केली.
sदेशाची संस्कृती भाजपने बिघडवली
सध्या महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले आहे. जो तो उठतो आणि महापुरूषांवर टीका करतो. पुढाऱयांवर टीका करतो. महाराष्ट्रातील सगळे प्रश्न संपले का? लोकांच्या अडचणी, विकासाचे प्रश्न संपले का? महाराष्ट्राची वैचारिकता, भूमिका काय आहे याचा कसलाही विचार न करता टीका केली जात आहे आणि देशातील व राज्यातील राजकारण बिघडवण्याचा प्रयत्न हा भाजपाने केला आहे. देशाची संस्कृती, संस्कार, संसार भाजपाने बिघडवली आहे. सत्तेचा माज भारतीय जनता पार्टीला आला आहे. महाराष्ट्रात उध्दवसाहेबांची शिवसेना फोडण्याचे कामही भारतीय जनता पार्टीने केले आहे. महाराष्ट्रात सर्व जात, धर्म हे उध्दव यांच्या नेतृत्वाखाली गुण्यागोविंदाने नांदू शकतात, तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हे होऊ शकत नाही, हे जनतेने आता ओळखले आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन काम करा. आपण आपले स्थान निर्माण करा, जिथे माझी मदत लागेल तिथे मी करेन. तुम्हाला निश्चितपणे दुसरा आमदार मिळेपर्यंत मी तुमचा आमदार म्हणून काम करेन, अशा विश्वास शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शेवटी बोलताना दिला.
जिल्हा प्रमुख हर्षद कदम म्हणाले, 1997 साली शंभूराज देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून संघटनेची तालुक्यात वाताहात झाली, याला आम्ही साक्षीदार आहोत. 2014 ला मी शिवसेनेचा सातारा जिल्हा प्रमुख म्हणून काम केले. हे पद मी मोठय़ा घराण्यातील आहे म्हणून मिळाले नाही. माझ्या वडिलांनी 1980 सालापासून धर्मवीर आनंद दिघेसाहेबांबरोबर काम केले त्या कामाच्या निष्ठेने हे पद मला मिळाले. आज तालुक्याचे आमदार दिघेसाहेबांचा फोटो वापरतात ही अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे.
उपजिल्हा प्रमुख गजानन कदम, तालुका प्रमुख सुरेशनाना पाटील यांची भाषणे झाली. यावेळी तालुक्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत आमदार जाधव यांनी केले.