घराच्या बांधकामांवर पाणी मारत असताना विजेचा शॉक लागून गणेशवाडी (ता.करवीर) येथील तरूणांचा मृत्यू झाला. साहिल भिवा चव्हाण (वय १८) असे त्या तरूणाचे नाव आहे. सदरची घटना दुपारी तीन वाजता घडली. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील लाड गल्लीत चव्हाण कुटुंबियांचे घराचे बांधकाम सुरू आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साहिल हा बांधकामावर पाणी मारण्यासाठी आला होता. मोटर चालू झाल्यावर साचलेल्या पाण्यातून विजेचा शॉक त्याच्या पायाला लागला. दुपारची वेळ असल्याने ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. इमारतीच्या मागील बाजूस गवंडी गिलावा करण्यात व्यस्त होते. गवंड्याने पाहिल्यावर ही घटना लक्षात आली. तातडीने त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. पण तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली होती. साहिल हा मनमिळाऊ व खेळकर स्वभावाचा होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. घटनास्थळावरील वातावरण हृदय पिळवटून टाकणारे होते. साहिल च्या मागे आईवडील, भाऊ, चुलता, चुलती, आजी आजोबा असा परिवार आहे.