पंत-जडेजाची उपयुक्त खेळी, वुड-रॉबिन्सनचे प्रत्येकी 2 बळी
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱया कसोटीच्या दुसऱया दिवशी उपाहारानंतर भारताचा पहिला डाव 364 धावांत संपुष्टात आला. दिवसातील पहिल्या सत्रातच चार बळी गमविल्याने भारताची स्थिती 7 बाद 336 अशी झाली होती. पण रिषभ पंत व रविंद्र जडेजा यांनी उपयुक्त फलंदाजी करीत भारताला साडेतीनशेच्या पुढे मजल मारून दिली. इंग्लंडतर्फे जेम्स अँडरसनने 5 तर रॉबिन्सन व मार्क वुड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात 11 षटकांत बिनबाद 16 धावा जमविल्या होत्या.
सकाळच्या सत्राअखेर भारताने 7 बाद 346 धावांपर्यंत मजल मारली होती. यावेळी जडेजा 31 धावांवर खेळत होता तर इशांत शर्मा त्याला शून्यावर साथ देत होता. शतकवीर केएल राहुल (129), अजिंक्य रहाणे (1), रिषभ पंत (37) व मोहम्मद शमी (0) हे फलंदाज या सत्रात बाद झाले. राहुल व रहाणे पाच चेंडूंच्या फरकाने बाद झाल्यामुळे भारताचा डाव लवकर गुंडाळला जाणार असेच वाटले होते. पण जडेजासमवेत डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा पंत मार्क वुडच्या चेंडूवर यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाला.
राहुल, रहाणे झटपट बाद
3 बाद 276 अशा मजबूत स्थितीत भारताने दुसऱया दिवसाच्या खेळास प्रारंभ केला होता. पण राहुल केवळ दोन धावांची भर घालू शकला. त्याने 250 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार, एक षटकार मारला. शानदार शतक नोंदवणाऱया राहुलने दिवसातील दुसऱयाच चेंडूवर जोरदार ड्राईव्ह मारला. पण तो थेट कव्हरवरील फिल्डरच्या हातात गेला. पुढच्या षटकात रहाणेलाही अँडरसनने पहिल्या स्लिपमध्ये झेलबाद केले. तो एकाही धावेची भर घालू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत शतक नोंदवल्यानंतर रहाणेला त्यानंतर एकही मोठी खेळी करता आलेली नाही. गेल्या 22 कसोटी डावांत त्याची सरासरी 30 च्या खाली आहे.
दोन झटपट गडी बाद झाले असले तरी पंतने बिनधास्त फलंदाजी करीत इंग्लिश गोलंदाजांना समर्थपणे तोंड दिले. त्याने 58 चेंडूत्नाच 37 धावा जमविताना जडेजासमवेत 49 धावांची भर घातली. वुडच्या गोलंदाजीवर बाद होण्याआधी त्याने पाच चौकार मारले. शमीही फक्त दोन चेंडू टिकला. मोईन अलीच्या गोलंदाजीवर बर्न्सने त्याचा झेल टिपला. यावेळी भारताची स्थिती 7 बाद 336 अशी झाली होती. जडेजाने उपाहारानंतर इशांत शर्माच्या साथीने आणखी 26 धावांची भर घातली. इशांत (8) बाद झाल्यानंतर बुमराह व जडेजा लगेचच बाद झाल्याने भारताचा डाव 126.1 षटकांत 364 धावांत संपुष्टात आला. अनुभवी जेम्स अँडरसनने 62 धावांत 5 बळी टिपले तर वुड व रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 2 आणि मोईनने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः रोहित शर्मा 83 (145 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार) केएल राहुल 129 (250 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), पुजारा 9 (23 चेंडूत 1 चौकार), कोहली 42 (103 चेंडूत 3 चौकार), रहाणे 1 (23 चेंडू), रिषभ पंत 37 (58 चेंडूत 5 चौकार), जडेजा 40 (120 चेंडूत 3 चौकार), शमी 0, इशांत शर्मा 8 (29 चेंडूत 1 चौकार), बुमराह 0 (6 चेंडू), सिराज नाबाद 0, अवांतर 15. एकूण 126.1 षटकांत सर्व बाद 364.
गोलंदाजी ः अँडरसन 5-62, रॉबिन्सन 2-73, मार्क वुड 2-91, मोईन अली 1-53, सॅम करण 0-72.
इंग्लंड प.डाव 11 षटकांत बिनबाद 16 ः बर्न्स खेळत आहे 9, सिबली खेळत आहे 6.