वार्ताहर/ कराड
भाजीपाला व किराणा दुकानच्या नावाने दिवसभर फिरणाऱया लोकांना चाप लावण्यासाठी शासनाने बुधवारपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने अकरा वाजता बंद निर्णय घेतल्याने अकरानंतर शहरात शुकशुकाट पसरला. दवाखाने व मेडिकल वगळता अत्यावश्यक सेवेतील अन्य सर्व दुकाने अकराच्या ठोक्याला बंद झाल्याने शहरातील रस्ते ओस पडले होते.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने राज्यात अंशता लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल, किराणा, दूध, भाजीपाला, चिकन, मटण, बेकरी, शेती व पशुवैद्यकीय दुकाने सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. तर अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र अंशतः लॉकडाऊन असतानाही शहर व ग्रामिण भागातील गर्दी दिवसभर हटताना दिसत नव्हाती. अनेक लोक किराण अथवा अन्य अत्यावश्यक सेवेतील दुकानचे नाव सांगून विनाकारण फिरताना दिसत होते. परिणामी लॉकडाऊन असतानाही कोरोना बाधितांची संख्या कमी होत नव्हती.
यावर पर्याय काढण्यासाठी शासनाने बुधवारपासून दवाखाने व मेडिकल वगळता अन्य सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी पहिल्याच दिवस असल्याने किराणा व भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. बरोबर 11 वाजण्याच्या सुमारास शहरातील दवाखाने व मेडीकल वगळता अन्य सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद करण्यात आली. यामुळे अकरानंतर शहरातील सर्व रस्ते ओस पडले होते. नंतर रस्त्यावर दिसणाऱया लोकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. अनेक लोकांना दंडही करण्यात आला. शहरात येणाऱया कोल्हापूर नाका, कार्वे नाका व कृष्णा नाका या सर्व रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. शहरात येणाऱया व शहरातून जाणाऱया सर्वांची कसुन चौकशी करण्यात येत आहे.