मुंबई/प्रतिनिधी
परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने दुसरं समन्स बजावल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने २८ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबद्दल परब यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. तर किरीट सोमय्या यांनी “आशा आहे की आता तरी अनिल परब चौकशीला हजर राहतील”, असं खोचक ट्विट केलं आहे. सोमय्यांनी परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ही समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी ईडीने सचिन वाझे याचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की पोलीस दल आणि परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये २० कोटी रुपये अनिल परब यांनी घेतल्याचं त्याने सांगितलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाचे अधिकारी आणि परब यांच्या जवळचे मानले जाणारे बजरंग खरमाटे यांचीही चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता परब यांना दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे. किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असून त्यासंदर्भात ते तक्रारही दाखल करत आहेत.