अनंत कंग्राळकर/ बेळगाव
कोरोना विषाणूमुळ लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे असंख्य नागरिकांना नोकरी व्यवसायाला मुकावे लागले आहे. त्यामुळे परप्रांतियांनी घरचा रस्ता धरला आहे. पण पोहोचण्यासाठी परिवहन सुविधा नसल्याने आपल्या चिमुकल्या बाळांना घेऊन घरी जाताना खडतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बेळगावात अडकलेल्या परप्रांतियांना आपल्या चिमुकल्यासह रमजान ईदचा सण देखील सीपीएड मैदानावर करण्याची वेळ आली आहे.
लॉकडाऊन करण्यात आल्याने असंख्य परप्रांतीय कामगार बेरोजगार झाले आहे. सर्व कामे बंद ठेवण्यात आल्याने घरचा रस्ता धरला आहे. पण परिवहन सुविधा बंद असल्याने घरी जायचे कसे? ही समस्या भेडसावत आहे. घरचा रस्ता धरला असताना मिळेल त्या वाहनाने जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण जाताना सरकारी नियमावलीचा अडथळा पार करावा लागत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने वाढत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने अनेक बंधन घातली आहे. अशातच गावाकडच्या सदस्यांची हाक सतावत आहे. देशातील परिस्थिती खूपच बिकट झाल्याने कुटुंबातील सदस्य चिंतेत आहे. त्यामुळे मिळेल ते वाहन पकडून घरी जाण्यासाठी परप्रांतीय प्रयत्न करीत आहेत. बेळगावात आलेल्या हजारो परप्रांतीय कामगारांना रेल्वेद्वारे आणि बसच्या माध्यमातून स्वगृही पाठविण्यात आले. पण झारखंड, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्यातील कामगारांना घरी जाण्यासाठी बसची सुविधा नाही, आणि रेल्वेची सुविधा नाही. अशातच काही राज्य शासनाने कामगारांना पाठविण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे परप्रांतीय कामगार बेळगावात अडकून पडले आहेत.
गावाकडे जाण्यासाठी आपल्या चिमुकल्यासह एक कुंटूंब गेल्या आठ दिवसापासून सीपीएड मैदानावर ठाण मांडून आहे. जमीन बिछाना आणि आकाश चादर अशा परिस्थितीत परप्रांतीय कामगार आपल्या चिमुकल्यांसह गावाकडे जाण्यासाठी परिवहन सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत. सदर कुटुंब मुस्लिम समाजाचे असून एक आणि दोन, चार वर्षे वयाच्या तीन बालकांचा समावेश आहे. गावाकडे जाण्यासाठी कामगार खात्याकडून बस किंवा रेल्वेची क्यवस्था होईल या अपेक्षेत दिवस काढत आहे. त्यांना रमजान ईदचा सण देखील साजरा करता आला नाही. सणा दिवशी जेवणाची व्यवस्था देखील झाली नाही. एरवी महापालिकेकडून जेवण देण्यात येत आहे. पण लहान बालके जेवण अशी खाणार, त्यांना दुध किवा अन्य खाद्यपदार्थाची व्यवस्था उपलब्ध नाही. अशा खडतर परिस्थितीत गावाकडे जाण्याच्या प्रतिक्षेत हे कुटुंब सीपीएड मैदानात ठाण मांडून आहे. त्यांचीही प्रतिक्षा कधी संपणार आणि आपल्या गावी सुरक्षित कधी पोचणार ? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. सीपीएड मैदानावर ठाण मांडलेल्या परप्रांतीय कामगारांना तातडीने पाठविण्याची व्यवस्था करावी, अन्यथा त्यांना राहण्याची व्यवस्था उपलब्ध करावी अशी मागणी होत आहे.