पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची ‘मतधुमाळी’ आता ऐन रंगात आली आहे. निवडणूक प्रक्रिया मतदानाच्या प्रथम टप्प्यापासून तब्बल 5 आठवडे चालणार असल्याने तोवेळपर्यंत हाच विषय वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये अग्रस्थानी असणार हे निश्चित. त्यातही बंगालमधील निवडणूक हे औत्सुक्याचे विशेष केंद्र बनली आहे. याचे कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत तेथे भाजपला अनपेक्षितरित्या मिळालेले घवघवीत यशात दडलेले आहे. या यशामुळे या पक्षाचा उत्साह वाढला असून आता विधानसभा निवडणुकीतही तृणमूल काँगेस आणि त्या पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर कुरघोडी करणे शक्य होईल, असा विश्वास त्याला वाटू लागला आहे. परिणामी, या पक्षाने बंगालमध्ये आपले सामर्थ्य पणाला लावले आहे. निवडणूक चुरशीची होणार असा रागरंग दिसत असल्याने सर्व राजकीय पक्ष विविध क्लृप्त्या आणि हातखंडे आजमावून पाहणार हे निश्चित आहे. या सर्व ‘राजकारणभारित’ वातावरणात ‘ममता बॅनर्जी जखमी’ हे वृत्त झळकले. ममता बॅनर्जी ही निवडणूक आपल्या नेहमीच्या भवानीपूर मतदारसंघातून न लढविता नंदीग्राममधून लढविणार आहेत. तेथे त्यांची स्पर्धा त्यांचेच एकेकाळचे उजवे हात मानले जाणारे आणि आता भाजपमध्ये आलेले सुवेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे. बुधवारी बॅनर्जी यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आणि त्या देवीदर्शनाला मंदिरात गेल्या. तेथून परतताना त्यांच्याच कारचा दरवाजा त्यांच्या पायावर आपटून त्या जखमी झाल्या. त्यांना त्वरित कोलकाता येथील रूग्णालयात आणण्यात आले आणि उपचार सुरू आहेत, असे हे वृत्त आहे. पण यातील महत्त्वाचा आणि गंभीर भाग असा की आपल्यावर हल्ला करण्यात आला आहे, असा दावा बॅनर्जी यांनी केला. तृणमूल काँगेसनेही लगोलग तो उचलून धरला आणि त्यासाठी भाजपला जबाबदार धरले. या उलट, असा कोणताही हल्ला झालेला नाही. भाजप किंवा त्याच्या कार्यकर्त्यांचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. ममतांना आपला पराभव दिसू लागल्याने त्यांनी जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी हे नाटक चालविले आहे, असा प्रत्यारोप भाजपने केला आहे. या घटनेची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी अशी मागणीही या पक्षाने केली. परस्परविरोधी दाव्यांच्या या गदारोळात आता हाच मुद्दा प्रमुख बनविला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक प्रचार काळात अपघात किंवा घातपात या दोन्ही बाबी आपल्या देशात नव्या नाहीत. तसेच अशा घटनांचे राजकीय भांडवल करून जनतेचा मनात अनुकंपा निर्माण करण्याचे राजकीय पक्षांचे डावपेचही जनतेला चांगलेच परिचित आहेत. ममता बॅनर्जींच्या संदर्भात जे घडले, त्यासंबंधी आत्ताच निश्चितपणे काही सांगता येणे कठीण आहे. कारण अद्याप या प्रकरणाची चौकशी होऊन निष्कर्ष हाती यायचा आहे. तरीही काही प्रश्न निर्माण होतात आणि चौकशीतून या प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळावीत अशी रास्त अपेक्षा आहे. ममता बॅनर्जी या एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री जेव्हा कोठेही जातो, तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या सुरक्षा सैनिकांची तुकडी असतेच. या प्रसंगात सुरक्षा सैनिक त्यांच्या आसपास नव्हते, हे संभवत नाही. हे हल्ल्याचे प्रकरण असेल तर तो होत असताना किंवा झाल्यानंतर या सुरक्षा सैनिकांनी कोणती हालचाल केली, याची माहिती स्पष्ट झालेली नाही. बॅनर्जी नेमक्या अशा प्रकारे जखमी झाल्या याचे स्पष्ट व्हीडिओ चित्रणही अद्याप प्रसारित करण्यात आलेले नाही. कोणताही मुख्यमंत्री जेव्हा देवदर्शन किंवा तत्सम अन्य धार्मिक अगर सामाजिक कार्यासाठी बाहेर पडतो तेव्हा त्याच्या मागेपुढे विविध वृत्तवाहिन्या, सुरक्षा व्यवस्था, पक्षकार्यकर्ते आदींचे कॅमेरेही असतात. कॅमेऱयांच्या उपस्थितीशिवाय असे कार्यक्रम केले जात नाहीत. विशेषतः अत्यंत चुरशीची निवडणूक जवळ आलेली असताना राजकीय नेते आपली प्रत्येक सार्वजनिक कृती जनतेपर्यंत पोहचावी आणि आपल्या मतांमध्ये वाढ व्हावी, याची पुरेपूर दक्षता घेतात. अशा स्थितीत नेमक्या याच प्रसंगाचे स्वच्छ व्हीडिओ चित्रण झालेले नसणे कसे शक्य आहे ? हे चित्रण प्रसिद्ध झाल्यास सर्व बाबींवर नेमका प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. याच संदर्भात जे नवे वृत्त हाती आले आहे, ते लक्षणीय आहे. पोलिसानी प्राथमिक चौकशीनंतर हा हल्ला नसून अपघातच आहे, असे स्पष्ट केले आहे. तसे असेल तर या घटनेचे ममता बॅनर्जी किंवा त्यांच्या पक्षाने राजकारण करणे चुकीचे ठरते. कारण अपघात हा पूर्णतः वेगळा विषय असतो आणि तो घडतो. घडविला जात नाही. घडविला गेला असेल तर त्याची वर्गवारी अपघात अशी न करता घातपात अशी करावी लागते, आणि तसे असेल तर याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर आले पाहिजे. हा हल्लाच असेल तर कोणी केला, का केला, सुरक्षायंत्रणा त्यावेळी काय करत होती, सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी कोणाची होती, हे सारे प्रश्न उपस्थित होतात. पण हा अपघात असेल तर सुरक्षा यंत्रणा त्यात फारसे काही करू शकत नाही, हे देखील ओघानेच येते. अनेक वृत्तवाहिन्यांनी हा प्रसंग पाहिल्याचा दावा करणाऱया स्थानिकांकडे विचारणा केल्याचे चित्रण दाखविले आहे. त्यात अनेकजण हा अपघातच होता असे सांगताना दिसतात. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही यावर प्रचंड वादंग माजलेले दिसते. पश्चिम बंगाल हे राज्य नेहमीच संवेदनशील म्हणून ओळखले जाते. कोणत्याही निमित्ताने या राज्यात हिंसाचार घडू शकतो. तशातच सध्या निवडणुकीचा काळ आहे. म्हणून या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी त्वरित होणे आवश्यक आहे. हा घातपात असेल तर त्याची पाळेमुळे खणून काढून दोषी (मग ते कोणीही असले तरी) त्यांच्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. जर हा अपघात असेल तर मात्र, त्याचा लाभ सहानुभूती मिळविण्यासाठी करून घेणे निषेधार्ह आहे. तसेच अपघाताला हल्ला म्हणून संबोधणेही असमर्थनीय आहे, याची जाणीव सर्व संबंधितांनी ठेवली पाहिजे. अन्यथा काटय़ाचा नायटा होण्याची शक्यता असते.
Previous Articleस्वीसच्या फेडररचे विजयी पुनरागमन
Next Article म्यानमारमध्ये गोळीबारात आणखी 6 आंदोलक ठार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.