प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या अनेक रस्त्यांचे काम अर्धवट परिस्थितीत सोडण्यात आले आहेत. यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालकांना मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागत आहे. एपीएमसी ते कंग्राळी खुर्द, हिंडलगा मार्कंडेय पुलापासून मण्णूर, वेंगुर्ला रोड हिंडलगा ते बाची गावापर्यंत आणि वेंगुर्ला रस्ता ते उचगाव गावापर्यंतचे रस्ताकाम अर्धवट करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी कंत्राटदार सोडून गेल्याने समस्या निर्माण झाली आहे. सध्या पावसाळा तोंडावर आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. यासाठी या अर्धवट रस्त्यांचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी उचगाव जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या रस्त्यांबाबत अनेकवेळा जिल्हा प्रशासनाद्वारे मागणी करूनही रस्ता काम पूर्ण करण्यात आले नाही. यामुळे थेट जिल्हा पालकमंत्र्यांकडेच रस्त्यांसाठी मागणी करावी लागली असल्याचे यावेळी सरस्वती पाटील यांनी सांगितले. तसेच पावसाळय़ाआधी रस्त्यांचे काम पूर्ण न झाल्यास या सर्व गावातील ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून उचगाव परीक्षा केंद्रावर सुळगा, अतवाड, कुदेमनी, तुरमुरी, बसुर्ते आदी गावातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा न घेता संबंधित गावातच परीक्षा केंद्र निर्माण करण्यात यावे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने त्याच ठिकाणी परीक्षेसाठी मुभा द्यावी, अशी मागणी सरस्वती पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ग्राम सुधारणा समितीचे अध्यक्ष आर. आय. पाटील उपस्थित होते.