साताऱ्यातील कोरोना घोटाळ्याची कबुली,
दोन लॅब बंद, काहींना नोटिसा तर सर्वांची होणार तपासणी, यापुढे अपलोड न करणाऱ्यांवर होणार फौजदारी दाखल
जिल्हाधिकारी शेखर सिंहांकडून तातडीची पत्रकार परिषद आणि प्रसिद्धीपत्रक जारी ● प्रशासनाची दिवसभरात उडाली भंबेरी ● ‘तरुण भारत’च्या वृत्ताने महाराष्ट्रभर हडकंप
दीपक प्रभावळकर / सातारा :
‘कोरोना अपलोड घोटाळय़ाला जबाबदार कोण?’ या ‘तरुण भारत’च्या मंगळवारच्या वृत्ताने सातारा जिल्हय़ातील या घटनेचा राज्यभर हडकंप उडाला. तर सातारा जिल्हा प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. सर्वच बाजुंनी प्रचंड टिका, जनतेमध्ये निर्माण झालेला संताप यामुळे जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी तोंडावर बोट धरले मात्र जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना मात्र या वृत्ताला तोंड देण्याशिवाय गत्यंतर नव्हते. म्हणून त्यांनी ‘तरुण भारत’च्या या वृत्ताबाबत खुलासा करणारे प्रसिद्धीपत्रक सकाळी 12.46 ला जारी केले आणि अवघ्या 15 मिनिटांनी त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली.
सुमारे आठ महिन्यांनी पत्रकार परिषद घ्याव्या लागलेल्या जिल्हाधिकारी शेखरसिंहांना ‘तरुण भारत’ने मांडलेल्या घोटाळय़ाची कबुली देण्याशिवाय कोणता पर्यायच उरला नव्हता. त्यांनी ‘तरुण भारत’ने मांडलेला प्रकार प्रत्यक्षात घडला असल्याची स्पष्ट कबुली दिली आणि ‘यापुढे 24 तासाच्या आत अहवाल अपलोड करा, अन्यथा फौजदारी दाखल करण्यात येईल’ असा दम भरला असल्याचे त्यांनी प्रसिध्दीपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे.
दरम्यान, सातारा जिल्हय़ातील या कोरोना अपलोड घोटाळय़ाची चौकशी सुरु आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करुन त्याची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या लॅबनी अहवाल अपलोड केले नाहीत अशा दोन लॅबची मान्यता रद्द करण्यात आली असून तीन लॅबला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अन्य लॅबलाही कडक कारवाईला सामोरे जावे लागले, असे त्यांनी मान्य केले.
‘तरुण भारत’ वर शुभेच्छांचा वर्षाव अन निवेदनाचा खच
मंगळवारच्या वृत्ताने सातारा जिल्हय़ातील गैरप्रकाराचा राज्यभर हडकंप उडाला. जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, कोरोना योध्दे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक महनीय व्यक्तींनी ‘तरुण भारत’ वर वास्तव समोर आणल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव केला. तर अनेक सामाजिक संस्थांनी घटनेच्या मुळाशी जावून संबंधित लॅबवर कडक कारवाई करण्याबाबत निवेदनांचा अक्षरशः खच लावला.
आठ महिन्यानंतर जिल्हाधिकारी माध्यमांसमोर
‘तरुण भारत’ च्या वृत्ताने भंबेरी उडालेल्या प्रशासनाला यथोचित खुलासा करणे आवश्यक बनले. त्यामुळे महामारीच्या ऐन दुसऱया लाटेत जिल्हाधिकारी शेखर सिंह तब्बल आठ महिन्यानंतर प्रसिध्दी माध्यमांच्या समोर आले आणि पहिल्यांदाच दिलखुलास संवाद साधला. पत्रकार परिषदेत जिल्हय़ात कोरोना आल्यापासून ते तिसऱया लाटेपर्यंत काय उपाय योजना करणार आहे यावर त्यांनी सुमारे 42 मिनिटे सलगपणे विवेचन केले आणि त्यानंतर सुमारे सव्वा तास पत्रकारांच्या हरेएक प्रश्नाला सविस्तर उत्तरे दिली.
वास्तविक तीन वाजता त्यांना राज्यस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होणे आवश्यक होते. मात्र, पत्रकारांच्या गराडय़ातून त्यांना सुटका नव्हती. सरतेशेवटी प्रभारी माहिती उपसंचालक युवराज पाटील यांना पत्रकारांच्या पाठीमागून हातवारे करत पत्रकार परिषद संपवावी लागली.
अहवाल वेळेत न भरल्यास फौजदारी
शक्य झाल्या त्यांचा नमुना तपासणीचा अहवाल मोबाईलवर आटोमॅटीक मॅसेज जाण्यासाठी क्लाऊड पॅथॉलॉजी या सॉफ्टवेअरचा वापर करावा. जेणेकरुन रुग्णांना वेळेत अहवाल मिळू शकेल व अहवालासाठी बाहेर फिरण्याची आकारण्यात यावी. या सर्व सुचनाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा आपल्या लॅबची मान्यता पूर्णपणे रद्द करण्यात येईल व आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराच शेखर सिंह यांनी जिल्हय़ातील सर्व कोरोना टेस्टिंग करणाऱया लॅब चालकांना दिला आहे.
दोन लॅबची मान्यता रद्द तर तीन लॅबला कारणे दाखवा नोटीसा
कोरोना रिपोर्ट वेळीच अपलोड न केल्याच्या प्रकाराने जिल्हा प्रशासनाची झोप उडली आहे. याप्रकरणी सातारा जिल्हय़ातील दोन कोरोना टेस्टिंग लॅबची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तर तीन लॅबधारकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत व एकूण एक लॅबची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी सुरु झाली आहे. एवढय़ा गंभीर प्रकरणावर झालेली कारवाई ही किरकोळ आहे, असे अनेक अधिकारी खाजगीत मान्य करत होते. चूक मोठी असली तरी सर्व लॅबची मान्यता रद्द केल्यास नवा पेच निर्माण होईल, त्यामुळे सद्यस्थितीत त्यांना नोटीसा देवून परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्याचे प्रवधान प्रशासनाने कायम ठेवले असल्याचेही अधिकाऱयांनी यावेळी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.
लॅबचालकांना नवे नियम केले लागू, मिसकॉल देण्याची अट
सातारा जिल्हय़ातील घोटाळा अतिशय संतापजनक आहे. त्यामुळे यापुढे लॅबचालकांना जिल्हा प्रशासनाने नव्या अटी लागू केल्या आहेत. त्याप्रमाणे यापुढे
1. तपासणी झाल्यावर ऑनलाईन पोर्टलला नोंद करताना एसआरएफ आयडीवर रुग्णाचा पूर्ण पत्ता, सध्याचा पत्ता व आधारकार्डवरील पत्ता देणे आवश्यक आहे.
2. रुग्णाचा मोबाईल लिहिवा. दिलेला मोबाईल क्रमांक त्याच्याच हातात सुरु आहे याची खात्री मिसकॉल देवून करावी.
3. रिपोर्ट आल्यानंतर अहवाल रुग्णाला देतेवेळी ऑनलाईन पोर्टलवर नोंद करुन त्यावर आयसीएमआय क्रमांक देणे बंधनकारक आहे.
4. फॅसिलिटी ऍपमध्ये ऑपरेशन करतेवेळी आयसीएमआर नंबर शिवाय अपडेट करता येणार नाही.
5. रुग्णाला अहवाल देताना तो ज्या केंद्रास परवानगी मिळाली आहे त्याच केंद्राच्या लेटरहेडवर द्यावा.
6. शक्य झाल्यास अहवाल टोमॅटिक मेसेजवर जाण्यासाठी क्लाऊड पॅथॉलॉजी सॉफ्टेवअरचा वापर करा.
दीपक प्रभावळकर 9325403232, 9527403232