गस्तीवरील ट्रकमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
प्रतिनिधी/ लांजा
गुरुवार व शुक्रवारी दोन दिवस पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर तालुक्यातील आडवली स्टेशननजीक दरड कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. गस्तीवरील रेल्वे टॅकमन अभय पाटोळे यांच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला. मात्र दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक कोलमडली होती. सुमारे 3 तासांनी दरड बाजूला केल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
कोकण रेल्वेच्या आडवली रेल्वेस्थानकानजीक शुक्रवारी सकाळी 11 च्या दरम्यान दरड कोसळल्याने मुंबई व मडगावच्या दिशेने जाणाऱया गाडय़ा 2 तास उशिराने धावल्या. सध्या 2 दिवसापासून परतीचा पाऊस सुरू झाला असून त्याचा फटका शुक्रवारी कोकण रेल्वेला बसला. शुक्रवारी सकाळी 11च्या दरम्यान दरड कोसळताच मुंबई व मडगावच्या दिशेने जाणाऱया गाडय़ांना रत्नागिरी व विलवडे रेल्वेस्थानकात थांबवण्यात आले होते. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक काही काळ कोलमडले होते. ट्रकवरील कोसळ्लेली दरड बाजूला करण्याचे काम सुरू असल्याने सावंतवाडी-दिवा गाडीला विलवडे रेल्वेस्थानक येथे तर राजधानी गाडीला निवसर रेल्वेस्थानकात थांबवण्यात आले होते. दरड बाजूला केल्यानंतर 2 तासांनी दोन्ही गाडय़ांना पुढील प्रवासाला पाठवण्यात आले. जोरदार पाऊस व दरड कोसळल्याने कमी वेगाने गाडय़ा धावत असल्याचे समजते.
सावंतवाडी–दिवा गाडी रोखून धरली
आडवली-वेरवलीदरम्यान गस्तीवर असलेल्या ट्रकमन अभय पाटोळे यांना ट्रकवर दरड आल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान साधून तातडीने आडवली स्टेशन मास्तर व संबंधित अधिकाऱयांना या बाबत कळविले. यानंतर यंत्रणा त्वरित घटनास्थळी दाखल झाली. सावंतवाडी ते दिवा ही ट्रेन वेरवली येथून निघणार होती, परंतु वेळीच ही गाडी रोखून धरण्यात आली. मार्गावर दरड कोसळल्याने मडगाव-हाप्पा, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी या गाडय़ा विलंबाने धावत होत्या. रेल्वे अधिकारी व कर्मचाऱयांच्या अथक प्रयत्नाने दरड बाजूला करण्यात आली. यानंतर दुपारी 2 वाजता मार्ग सुरळीत झाला.