कोविड-19च्या संक्रमणाला सुरुवात झाल्यापासून, ‘कोविड’ आणि निव्वळ ‘कोविड’च सर्वत्र व्याप्त झाल्याचे चित्र आहे. कोविड-19 शिवाय आरोग्याचे इतरही प्रश्न आहेत ज्यांची दखल घेणे गरजेचे आहे. कोविडसाठी उपचार देणे हे सांप्रत स्थितीत जितके गरजेचे आहे, तितकेच इतर आजारांवरील उपचारही महत्त्वपूर्ण आहेत. भारतातील प्रौढ लोकसंख्येमध्ये मधुमेहींचे प्रमाण 7.2… आहे. कर्करोग बाधित नवीन रुग्णांची संख्या मागील वषी 11,57,294 एवढी होती. थलॅसमिया रुग्णांची आपल्याकडील संख्या 65 ते 67 हजारांच्या आसपास आहे. दरवषी त्यात नऊ ते दहा हजार नवीन रुग्णांची भर पडत असते. डायलेसिसवर असणाऱया रुग्णांची संख्या 1,30,000 आहे. या रुग्णांना उपचारांकरिता रुग्णालयांमध्ये नियमितपणे दाखल व्हावे लागते. या व्यतिरिक्त हृदयविकार, ब्लडप्रेशर, अस्थमा, डेंग्यू, मलेरिया, उलटय़ा-जुलाब यासारख्या आजारांकरिता उपचार घ्यावा लागणाऱया रुग्णांची संख्या वेगळीच. टाळेबंदीच्या काळात अपघात अगदी नगण्य होते तरी रुग्णालयीन उपचारांमध्ये हा आकडाही होताच. नियमित तपासणीसाठी येणाऱया गर्भवती महिला वा प्रसूतीसाठी येणाऱया महिला हा रुग्णालयीन सेवा घेणारा अविभाज्य घटक. रुग्णालयांना नियमित भेट द्याव्या लागणाऱया अशा अनेकांनी आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागल्याचा अनुभव, सुरुवातीच्या टाळेबंदीच्या काळात घेतला. टाळेबंदीच्या काळात अवयव प्रत्यारोपणाची एकही शस्त्रक्रिया झाली नाही. नेत्रदान, रक्तदान यासारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय गरजांवर परिणाम झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. काही खासगी/धर्मादाय रुग्णालयातील मानसिक आजारांचे आंतररुग्ण विभाग, हे ‘कोविड-19’ रुग्णाच्या उपचारांसाठी रुपातंरीत करण्यात आल्याने, या रुग्णांचीही गैरसोय झाली. थोडक्मयात कोविड-19 च्या संक्रमणाने आरोग्य सेवेचे संपूर्ण लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
कोरोना संक्रमणाच्या काळात इतर असांसर्गिक आजारांच्या प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सेवांवर काय परिणाम झाले याबाबत ‘जागतिक आरोग्य संघटने’कडून एक सर्वेक्षण केले गेले. मे महिन्यात, तीन आठवडय़ांच्या कालावधीत 155 देशात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. कोविड महामारीमुळे असांसर्गिक आजारांचे उपचार दुर्लक्षित झाले असल्याचे, या सर्वेक्षणातून समोर आले आहे. कमी उत्पन्न असलेल्या देशातील असांसर्गिक आजारांच्या रुग्णांना मिळणाऱया आरोग्य सेवांवर, ‘कोविड-19’चा सर्वाधिक परिणाम झाला आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या निम्म्याहून अधिक (53…) देशांमध्ये, असांसर्गिक आजारांच्या रुग्णांना देण्यात येणारी वैद्यकीय सेवा पूर्णपणे अथवा अंशत: खंडित झाली आहे, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मधुमेह वा त्याच्याशी संबंधित आरोग्य तक्रारींसाठी उपचार घेणाऱयांपैकी 49…, कर्करोगावर उपचार घेणाऱयांपैकी 42… आणि तातडीच्या हृदयविकार सेवा आवश्यक असणाऱयांपैंकी 31… रुग्णांना त्याची झळ पोहोचली असल्याचे समोर आले आहे. आरोग्य पुनर्वसन सेवांवर परिणाम झाला असल्याचे, जवळपास दोन तृतीयांश (63…) देशांचे म्हणणे आहे. असांसर्गिक आजारांच्या रुग्णांना सेवा देणाऱया वैद्यकीय कर्मचाऱयांना ‘कोविड-19’ च्या उपचारांमध्ये अशंत: अथवा पूर्णत: वळवण्यात आले असल्याचे अधिकांश (94…) देशांनी म्हटले आहे.
व्यापक स्तरावर घेण्यात येणारे सार्वजनिक चिकित्सा कार्यक्रम, जसे की स्तन अथवा गर्भाशयमुख कर्करोग चाचणी आदि आरोग्य कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे, जवळपास 50… देशांनी म्हटले आहे. ‘कोविड-19’ संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने, गैरतात्काळ आरोग्य सुविधा कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचा थोडाबहुत परिणाम आजही आरोग्याच्या इतर सेवांवर होत असलेला दिसून येत आहे. इतर आजारांवरील आरोग्यसेवा खंडित होण्यामागील प्रमुख कारणांपैकी, औषधे, निदानात्मक सेवा आणि तंत्रज्ञानाची कमतरता हे एक कारण असल्याचे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या, वीस टक्के देशांनी म्हटले आहे. इतर आजारांच्या आरोग्य सुविधेत अनियमितता आली असल्याचे नमूद केलेल्या देशांपैकी, 58… देश ‘टेलिमेडिसीन’ (ऑनलाईन अथवा टेलिफोनिक वैद्यकीय सल्ला) पर्यायाकडे वळलेले आहेत. गरीब देशांमध्ये टेलिमेडिसीनचे प्रमाण तुलनेने कमी आहे. हे सर्वेक्षण आरोग्य सेवा क्षेत्राला खूप काही शिकवून जाणारे आहे. यापूर्वी सार्स, मर्स, ईबोला, एचवनएनवन (स्वाईन फ्लू) आदि अनेक विषाणु संसर्गांना भारतासहित जगभरातील अनेक देश सामोरे गेले आहेत. ‘कोविड-19’ च्या प्रसाराचा वेग पाहता मात्र या महामारीने भयावह स्थिती निर्माण केली आहे. जगभरात वैद्यकीय सेवांच्या बाबतीत पुढारलेल्या देशांमधील मृत्युंचे आकडे पाहता, आपल्याकडे उशिराने पोचलेल्या ‘कोविड-19’ ला रोखण्यासाठी ‘टाळेबंदी’ला प्राधान्य देण्यात आले. ‘कोविड-19’ च्या संसर्गाची एक अमूर्त भीती सर्वसामान्यांच्या मनात घर करून राहिलेली आहे. साठ वर्षापुढील, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असणाऱयांना ‘कोविड-19’चा असणारा धोका लक्षात घेता, हे आजार असणाऱया अनेक व्यक्तींनी भीतीपोटी उपचारांकरिता रुग्णालयात जाण्याचे टाळले. ‘संचारबंदी’च्या काळात वाहने मिळणे कठीण होते. वाहन मिळून डॉक्टरांकडे पोहोचल्यास, डॉक्टरांनी सखोल चिकित्सा न करता केवळ गोळय़ा-औषधांवर रुग्णांची बोळवण केल्याचा अनुभवही काहींनी घेतला. या दुर्लक्षांमुळे काहीजणांना हृदयविकाराच्या झटक्मयाने प्राण गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. नॅशनल सॅम्पल सर्वे (2017-18) च्या आकडेवारीनुसार भारतातील 66… लोक खासगी रुग्णालय/डॉक्टरांमार्फत उपचार घेतात. कोविड-19 च्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात, संक्रमणाच्या भीतीने काही खासगी रुग्णालयांनी आरोग्य सेवा देणे बंद केले होते. संक्रमणाच्या भीतीने सरकारी रुग्णालयात जाण्यास लोक आजही घाबरत आहेत. परिणामी असांसर्गिक आजारांच्या उपचारांबाबत, कोरोनाच्या भीतीने चालढकल करणाऱया रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. असांसर्गिक आजारांच्याबाबतीत, विशेषत: मधुमेही आणि रक्तदाब असणाऱया रुग्णांनी रुग्णालयातील नियमित उपचारांबाबत घेतलेली जी भीती आहे, ती आपल्याला लहान मुलांच्या लसीकरणाच्याबाबतीतही दिसून येत आहे. आज ना उद्या कोरोनाचे प्रमाण कमी होईल, तेव्हा आपण आपल्या पाल्याला लस देऊ, या स्वत:च करून घेतलेल्या समजुतीपायी, पालक मुलांचे लसीकरण पुढे ढकलण्याची शक्मयता नाकारता येत नाही. ‘जॉन्स हाफकिन ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ या संस्थेतील संशोधकांनी ‘लॅन्सेट’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकामध्ये, कोरोनाकाळात बालक आणि मातांच्या आरोग्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे संभाव्य परिणामांचा आढावा घेणारा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. त्याच्या आधारे युनिसेफने भारतात पुढील वर्षभरात हजारो बालकांचा मृत्यु होण्याची भीती व्यक्त केली आहे. कोरोनाच्या व्यतिरिक्त असांसर्गिक आजार, बालक-गर्भवती मातांचे लसीकरण, अवयव प्रत्यारोपण, अपघातांमुळे अत्यवस्थ झालेले रुग्ण, क्षयरोग, एचआयव्ही एड्स, एपिलेप्सी, नेफ्रॉयसिस, थलॅसमिया आदि आजारांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना, कोरोनाकाळात आरोग्य सेवेपासून दूर राहावे लागल्याने, किती हानी पोहोचली याचा अभ्यास भारताच्या पातळीवर केला जाणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात कोरोनासदृश स्थिती उद्भवली, तर इतर आजार असणाऱया रुग्णासांठी काय व्यवस्था केली पाहिजे याचे किमान उत्तर आपल्याजवळ असेल.