प्रतिनिधी / बेळगाव
स्त्री ही मुळातच कणखर आहे. म्हणूनच तिच्याकडून कर्तव्याची अपेक्षा अधिक केली जाते. ती कुटुंबात आणि समाजात बदल घडवू शकते. त्यामुळे तिने नवीन पिढीवर संस्कार करणे अपेक्षित आहे, असे विचार सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इमानदार यांनी व्यक्त केले.
आदर्श महिला मंडळाचा 93 व्या वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रमुख वक्त्या मनीषा सुभेदार, मंडळाच्या अध्यक्षा स्मिता शंकरगौडा, सचिव गायत्री मोहिरे, खजिनदार गीता कित्तूर उपस्थित होत्या.
प्रारंभी कोरोनामुळे निधन झालेल्यांना, हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर पाहुण्यांच्या तसेच मंडळाच्या संचालिका अनुराधा लेले व उषा कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्मिता शंकरगौडा यांनी स्वागत केले. गीता कित्तूर व गायत्री मोहिरे यांनी परिचय करून दिला. अध्यक्षांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना स्वरुपा इनामदार यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘महि म्हणजे पृथ्वी व इला म्हणजे देवता’ असा अर्थ आहे. यावरून महिलांचे महत्त्व आपल्या लक्षात येते. ज्ञानदेवांच्या आई रुक्माई, तुक्याची आवली, कबिरांची पत्नी, तुलसीदासांची रत्नावली या महिलांचे वेगळेपण त्यांनी सांगितले.
राजद्रोह करण्यास नकार देणारी आम्रपाली, साकेतनगरीची रुपगर्विता यांनी आपले स्वत्व राखण्यासाठी कोणती किंमत दिली, याची माहिती त्यांनी दिली. संस्कारांची शिदोरी महिलांनी जपली पाहिजे व पुढच्या पिढीस दिली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
मनीषा सुभेदार यांनी, महिलांच्या आत्मचरित्रांचा आढावा घेऊन आता यशस्वी महिलांची आत्मचरित्रे प्रकाशित झाली पाहिजेत, असे सांगितले. या कार्यक्रमासाठी धनश्री कुलकर्णी, पद्मजा पाटील, मीना मुडलगी यांचे सहकार्य लाभले. प्रारंभी विजया नाईक यांनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले.