कीर्तनाकडून प्रबोधनाकडे…सुहासबुवांचे अखंड व्रत…
प्रतिनिधी /फोंडा
कीर्तन हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम मानले जाते. पण कीर्तन सांगून न थांबता ‘आधी केले व मगची सांगितले’ या उक्तीप्रमाणे कीर्तनकार सुहासबुवा वझे यांनी केवळ उपदेश न करता स्वतःला समाजप्रबोधनाच्या या कार्यात गुंतवून घेतले आहे. गोव्यात नवीन कीर्तनकार घडवितानाच सर्व समाजातील मुलांना या कलेविषयी आवड निर्माण करण्याची मोठी जबाबदारी वझे बुवांनी आपल्या खांद्यावर पेलली आहे. त्याही पुढे जाऊन ग्रामीण भागातील धालोत्सवाबरोबरच जत्रोत्सवाच्या माध्यमातून सामुहिक नामस्मरणाचा एक वेगळा सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारच्या समाजकल्याण खात्यातर्फे यंदाचा ’उत्कृष्ट समाज कार्यकर्ता’ पुरस्कार देऊन वझेबुवांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
संत नामदेव महाराजांनी ‘नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ या ओवीतून तत्कालीन समाजाला प्रबोधनाचा मार्ग दाखविला. संत उक्तीचे हेच सूत्र धरून वझेबुवांनी कीर्तनाच्या माध्यमातून सुसंस्कारीत माणसे व समाज घडविण्याचे व्रत गेली 23 वर्षे अविरतपणे सुरु ठेवले आहे. 23 वर्षांपूर्वी सुहासबुवा वझे यांनी आपण राहत असलेल्या बोरीच्या पाणीवाडय़ावर काही नागरिकांना सोबत घेऊन नामदिंडी सुरु केली. हरिनामात भक्तीची प्रचंड उर्जा व चैतन्य असते. मोठय़ा माणसाबरोबरच मुलांमध्ये हरिनामाची गोडी निर्माण झाल्यास त्यांच्यात चांगले बदल घडू शकतात ही बुवांची धारणा आहे. त्यातूनच गेली 23 वर्षे नामदिंडीचा हा उपक्रम अखंडपणे सुरु ठेवला आहे. गोमंत संत मंडळ या संस्थेच्या माध्यमातून फोंडा कीर्तन विद्यालय सुरु करून बुवांनी विविध समाजातील मुलांना कीर्तनाचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. आज फोंडय़ाबरोबरच माशेल येथे देवकीकृष्ण कीर्तन विद्यालय, म्हापसा येथे लक्ष्मीनारायण कीर्तन विद्यालय अशा तीन शाखा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत. या कीर्तन पाठशाळामधून अनेक विद्यार्थी कीर्तन शिकले व शिकत आहेत. वझे बुवांच्या विद्यालयात कीर्तन शिकलेले विद्यार्थी आज गोव्यातील विविध मंदिरांमध्ये कीर्तन सादर करताना दिसतात. केवळ गोवाच नव्हे महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, नरसिंहवाडी, सोलापूर, अक्कलकोट, मुंबई तसेच बडोदा प्रांतातही त्यांच्या विद्यार्थ्यांनी किर्तने सादर करून गोव्यातील कीर्तन परंपरेची पताका सर्वदूर पोचविली आहे. एकेकाळी गोव्यातील नवरात्रोत्सव व अन्य उत्सवांमध्ये इतर प्रांतातून कीर्तनकार यायचे. आज बुवांनी घडविलेल्या बाल व युवा कीर्तनकारांना महाराष्ट्र व अन्य राज्यात निमंत्रित केले जाते. चक्रीकीर्तन हा प्रकारही बुवांच्या कीर्तन विद्यालयामुळेच अधिक लोकप्रिय झालेला आहे.
वझेबुवा केवळ कीर्तन शिकवून थांबलेले नाहीत. तर पौष महिन्यात गावोगावी होणाऱया धालोत्सवात सहभागी होऊन महिलांमध्ये सामुहिक नामजपाची गोडी त्यांनी निर्माण केली आहे. दिवजोत्सवात सहभागी होणाऱया सुवासिनीकडून व लईराई देवीच्या धोंडगणाकडून दरवर्षी ते नामजप करून घेतात. त्यासाठी गोव्यातील खेडय़ापाडय़ात रात्री अपरात्री फिरून वाट्टेल ते कष्ट घ्यायची त्यांची तयारी असते. सामुहिक नामजपामुळे भक्ती वाढीस लागते. त्यामुळे मंदिरातील उत्सवामध्ये व गावातील लोकोत्सवामध्ये भक्ती रुजण्यास मदत होते, यासाठी ते आग्रही दिसतात.
सुहासबुवा वझे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधनाकडे वळविण्याचे आरंभलेले हे व्रत आता एक चळवळ बनली आहे. या उपक्रमात त्यांच्या अर्धांगिनी सुनिती वझे, मुलगा रुद्राक्ष व मुलगी शिवानी तसेच कीर्तन विद्यालयाचे पालक दामोदर कामत, देवानंद सुर्लकर, संतोष भगत, अर्चना अमोल प्रभू, प्रविणा बाळकृष्ण कदम, दया उपाध्ये, सरिता दत्ता मावजेकर यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभत आहे. वझे बुवांच्या या कार्याची दखल घेऊन सन् 2008 मध्ये त्यांना राज्य सरकारचा युवा सृजन पुरस्कार देण्यात आला. नाशिक येथील राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कारासह अनेक संस्थांनी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानीत केले आहे. राज्य सरकारने ‘उत्कृष्ट समाज कार्यकर्ता’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची उचित दखल घेतली आहे. माणूस वाईट गोष्टींच्या पटकन आहारी जातो, पण चांगल्या गोष्टी स्वीकारायला वेळ लागतो. आपण सुरु केलेले हे समाजप्रबोधनाचे व्रत निश्चितच फळाला येईल, याबद्दल पूर्ण खात्री असल्यानेच ते लोकांमध्ये जातात..!