प्रतिनिधी /राय
मूळ उत्तर भारतातील आणि सध्या नोकरीनिमित्त वर्णा औद्योगिक वसाहतीत काम करणाऱया आणि वेर्णा परिसरात राहणाऱया शेकडो भाविकांनी नागोवा वेर्णा येथील श्री नागेश महामाया मंदिरात महाशिवरात्री उत्सवात सहभाग घेतला.
महाशिवरात्रीच्या दिवशी फोंडा येथील विठ्ठलदास नागवेकर यांनी पहाटे सर्वप्रथम मंदिरात अभिषेक केल्यानंतर मंदिराच्या सदस्यांना अभिषेक करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.
इतर भाविकांना अभिषेक करण्यासाठी मंदिराच्या आवारात एक शिवलींग ठेवण्यात आले होते व या शिवलिंगावर उत्तर भारतातील या भाविकांनी मनोभावे अभिषेक केला होता.
या व्रतासाठी उत्तर भारतातील या भाविकांनी बरीच गर्दी केली होती. मात्र, मंदिराच्या सदस्यांनी सर्वाना रांगेत उभे केल्यानंतर आणि कोव्हीड नियमांचे योग्य ते पालन करुन देवस्थान समितीने हा कार्यक्रम घडवून आणला होता.
वेळ संपली, गर्दी तशीच
अभिषेकाचा कार्यक्रम दुपारी 2 वाजता बंद करण्यात आलेला असला तरी मंदिराबाहेर उत्तर भारतातील या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अभिषेकाचा लाभ घेता न आलेल्या अनेक भाविकांनी येत्या वर्षी सकाळच्याच सत्रातच अभिषेक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
श्री नागेश महामाया देवस्थानचे सचिव दत्तप्रसाद नागवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवरात्रीनिमित्त उत्तर भारतातील त्याचप्रमाणे बिहार आणि झारखंड राज्यातील महिलांसह अनेक भाविक या मंदाराच्या आवारात ज्योत वा पणती लावण्यासाठी अगत्याने येत असतात. शिवरात्रीच्या दिवशी मंदिराच्या आवारात दिवा लावण्याची त्यांची प्रथा आहे. त्यांची ही प्रथा पाहून मंदिर व्यवस्थापनाने या मंदिराच्या तुळशी वृंदावनाच्या जागेत सोय केलेली होती. या तुळशी वृंदावनाच्या परिसरात उत्तर भारतातील शेकडो महिलांनी दिवे, पणत्या लावून आपले धार्मीक कार्य पूर्ण केले अशी माहिती श्री. नागवेकर यांनी दिली.
वर्षातून एकदाच पालखी उत्सव
नागोवा येथील श्री नागेश महामाया देवस्थानात वर्षातून एकदाच पालखी उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी विविध प्रांतात विखुरलेले या देवस्थानचे महाजन यावेळी उपस्थिती लावतात. ज्या महाजनांना येणे शक्य नाही ते महाजन रक्कम पाठवून अभिषेकाची पावती काढतात. देवस्थान त्यांना पोस्टाने प्रसाद पाठवून देते.
या पालखीच्यावेळी इतर समाजातील महिला, पुरुष तसेच युवक- युवती व मुलांनीही उपस्थिती लावलेली होती. पालखीच्यावेळी फटाख्याची अनोखी आतषबाजी पाहून उपस्थित भाविकांची मने तृप्त झाली. यावेळी भाविकांसाठी फलाहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरावर केलेल्या विजेच्या रोषणाईने दूरवर असलेल्यांचेही लक्ष वेधून घेत होते.