मागील लेखात भगवंतांना आपण फसवू शकत नाही हे वाचल्यावर काही वाचकांनी प्रश्न केला की मग ‘प्रामाणिक’ कोणाला म्हणायचे? प्रत्येकाला वाटते की आपण प्रामाणिक आहोत अथवा प्रयत्न तरी करीत आहोत, पण प्रामाणिक कोण हे कसे ओळखायचे? अगदी चोर, भ्रष्टाचारीसुद्धा स्वतःला प्रामाणिक समजतात, त्यासाठी आपल्याला खरोखरीच प्रामाणिक जीवन जगायचे असेल तर प्रामाणिक कोण आहे हे समजून घेतले पाहिजे. ‘प्रामाणिक’ हा शब्द प्रमाण मानणारा यावरून येतो. ‘प्रमाण’ म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे पालन करणारा. उदाहरणार्थ भारतात राहणाऱया नागरिकांसाठी भारतीय संविधान हे प्रमाण आहे. त्याविरुद्ध जो वागतो त्याला दंड होतो. त्याचप्रमाणे मनुष्य जीवनातही काही प्रमाण अथवा काही मार्गदर्शक तत्त्वे नसतील तर आपण भरकटत जातो. कलीयुगामध्ये लोक गोंधळलेल्या अवस्थेत, त्रस्त मानसिक स्थितीत, सहजपणे भ्रष्टाचारी अनैतिक जीवनाच्या आहारी गेलेले दिसतात. याचे मूळ कारण आहे लोक प्रामाणिक राहू इच्छित नाहीत म्हणजे कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना दिसत नाहीत.
भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात (16.24) तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ।अर्थात मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे, अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. इथे शास्त्र याचा अर्थ शास्त्रप्रमाण म्हणजे गीता-भागवत या ग्रंथातील मार्गदर्शक तत्त्वे जाणून त्याचे पालन करणे. ज्याप्रमाणे आपण कोणतीही वस्तू विकत घेतो त्याबरोबर आपल्याला ती वस्तू कशी वापरावी यासाठी एक मार्गदर्शक पुस्तिका दिली जाते आणि त्यानुसार ती वस्तू वापरली तरच त्या वस्तूचा आपल्याला उपयोग होतो, अन्यथा नाही. उदाहरणार्थ आपण गाडी खरेदी केल्यावर त्यामध्ये पेट्रोल घालण्यास सांगितले असता त्यात डिझेल किंवा रॉकेल घातले तर गाडी चालणार नाही. उलट खराब होईल. त्याचप्रमाणे आपले शरीर हे भगवंतांनी दिलेले आहे आणि त्याचे संगोपन कसे करावे यासाठी गीता-भागवत हे मार्गदर्शक तत्त्व सांगणारे शास्त्र प्रमाणही दिले आहे त्यानुसार आपण वागलो नाही तर आपले जीवन उद्ध्वस्त तर होईलच पण दुर्लभ असा मनुष्यजन्मही वाया जाईल. जो शास्त्रविधीचे पालन करीत नाही त्याचे काय होते हेही भगवान श्रीकृष्ण सांगतात (16.23) यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ।अर्थात जो शास्त्रविधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. कलियुगामध्ये लोक शास्त्रविधीचे पालन करीत नाहीत म्हणून असमाधानी, दुःखी, आणि कायम गोंधळलेल्या अवस्थेत आणि अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. या सर्व गंभीर अवस्थेतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘प्रामाणिक’ राहणे अर्थात मनुष्य जीवनात गीता भागवतमधील ‘प्रमाण’ अर्थात मार्गदर्शक तत्त्वांचे मनुष्य जीवनात पालन करणे.
उपनिषदामध्ये सांगितले आहे ॐ ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्।। अर्थात, ‘या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू ही भगवंताद्वारे नियंत्रित आहे आणि त्यांनाच समर्पित आहे. मनुष्याने फक्त तेवढेच घ्यावे जेवढे आवश्यक आहे आणि जे मनुष्याच्या नियतीत आहे तेवढेच. मनुष्याने जाणले पाहिजे की जे दुसऱयाचे आहे, त्याचा स्वीकार नाही केला पाहिजे.’ सर्वप्रथम प्रामाणिकपणे आपण स्वीकारले पाहिजे की सर्व काही भगवंताचे आहे, म्हणून त्याच्या इच्छेनुसार त्याचा वापर केला पाहिजे. त्यांची इच्छा काय आहे हे गीता भागवत या ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे. श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात (9.27) यत्करोषि यदश्न?ासि यज्ज?gहोषि ददासि यत् । यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। अर्थात तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवे ते करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. म्हणून तर प्रत्येक धार्मिक विधीची सुरुवात ‘ओम केशवाय नमः’ ने होते व शेवट ‘श्री कृष्णार्पण अस्तु’ उच्चारूनच होतो. पण हे फक्त त्या धार्मिक विधीचा भाग नाही तर जीवनाचा भाग बनला पाहिजे. मला आठवते की माझी आजी आजोबा घरात कोणतीही वस्तू आणली की सर्वप्रथम ती श्रीविठ्ठल रुक्मिणी, गोपाळकृष्ण, शालिग्राम शिला असलेल्या देव्हाऱयासमोर भगवंताला अर्पण करून मगच ती वापरत असत. ही आपली वैदिक पद्धती आपण विसरून गेलो आहोत. जेव्हा आपण कोणतीही वस्तू भगवंताच्या आज्ञेविरुद्ध वापरतो त्याला ‘पाप’ म्हणतात. ‘प’ म्हणजे परमेश्वर आणि ‘अप’ म्हणजे विरुद्ध. म्हणून भगवतगीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात (3.13) यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषै । भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ।भगवद भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रियभोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखर केवळ पाप भक्षण करतात. म्हणून प्रामाणिकपणाची सुरुवात ही शरीराचे महाद्वार म्हणजे मुखातून होते. मुखाने आपण अन्न ग्रहण करतो आणि बोलतो, या दोन गोष्टी प्रामाणिकपणे केल्या की आपोआपच इतर सर्व गोष्टी जीवनामध्ये प्रामाणिकपणे करण्याची सवय आपल्याला लागते. त्यासाठी शास्त्रानुसार भगवंतांना नैवेद्य अर्पण करून मुखाने हरिनाम उच्चार करणे म्हणजे प्रामाणिक जीवनाची सुरुवात आहे. त्यातूनच सर्व काही भगवंताला अर्पण करण्याची भावना निर्माण होते आणि आपण खऱया अर्थाने प्रामाणिक जीवन पर्यायाने सुखी, समृद्ध, जीवनाला परमार्थ प्राप्त करून देणारे जीवन जगू शकतो. त्यासाठीच संत महंतांनी, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, शंकराचार्य, संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या आचार्यांनी गीता भागवतमधील मार्गदर्शक तत्त्वांचा आपल्या जीवनात स्वीकार केला आणि स्वानुभवावरून त्यांनी त्या तत्त्वांचा समाजाच्या उद्धारासाठी प्रचारही केला आणि समाजाला ‘प्रामाणिक’ कसे राहावे याची शिकवण दिली.
संत तुकाराम महाराज आपल्या जीवनात ‘प्रमाण’ अर्थात मार्गदर्शक कोण असावा याबद्दल सांगताना म्हणतात पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ।।1।। सर्वभावे लोभ्या आवडे हे धन । आम्हा नारायण तैशापरी ।।2।। तुका म्हणे एकविध झाले मन । विठ्ठलावांचून नेणे दुजे ।।3।। अर्थात पतिव्रता स्त्रीला जसा तिचा पती हाच प्रमाण असतो त्याचप्रमाणे आम्हाला नारायण आहे. लोभी माणसाला धनाचेच ध्यान लागलेले असते तशी आम्हाला नारायणाची आवड लागली आहे. माझे मन नारायणाशी एकविध, एकनि÷, एकांतिक झालेले आहे. आम्ही विठ्ठलावाचून दुसरे काही जाणत नाही. याचा आशय असा की जशी पतिव्रता पत्नी सर्वाशी प्रेमाने वागत असलीतरी तिचे सर्वस्व हे पती असते. पती हाच तिचा जीव की प्राण असतो, कारण ती पतीशी ‘प्रामाणिक’ असते. त्याचप्रमाणे नारायण अर्थात भगवान श्रीकृष्ण हेच आमचे प्रमाण आहे. त्यांनी दिलेला उपदेश जो पालन करतो तो ‘प्रामाणिक’ आहे. जर आपल्याला स्वतःची फसवणूक करून न घेता ‘प्रामाणिक’ राहायचे असेल तर गीता भागवत आपल्या जीवनात ‘प्रमाण’ असले पाहिजे.
वृंदावनदास