प्रतिनिधी / सातारा
शाहुनगरातील आमराई रेसिडन्सी या अपार्टमेंटमध्ये 25 सदस्य राहतात. त्यांना जाण्यायेण्याचा रस्ता गेल्या आठ दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. तो रस्ता खुला करुन देण्यात यावा, या मागणीसाठी गेले चार दिवस पालिका प्रशासन, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. रस्ता खुला करुन दिला नाही तर पालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे स्थानिक नागरिकांनी दिला.
निवेदनावर राजेंद्र फाळके, अनिल जाधव, दत्तात्रय इंगळे, अशोक खाडे, प्रकाश बोधे, तानाजी फाळके, भिमराव निकम, वंदना अवघडे, सुर्यकांत कर्णे, निलावती ढाणे, माणिकराव शिंदे, कृष्णा साळुंखे, दीपक माने, अशोक कुंभार, सुनील पवार, सर्फराज शेख, सत्वशिला काळे, सुमिता कदम, सुधीर पाठक, संतोष काशिद, अशोक गंबरे यांच्या सह्या आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , आमराई रेसिडन्सीमध्ये 25 कुटुंब राहतात. हे अपार्टमेंट जगतापवाडी ते शाहु चौक दरम्यान रोडलगत आहे. साधारण 15 वर्षांपासून या अपार्टमेंटची वहिवाट या रस्त्याने होत आहे. त्रिशंकू भाग हा हद्दवाढीनुसार सातारा पालिकेत आल्यामुळे खोदलेला रस्ता पालिकेने बुजवून 25 कुटुंबाची रहदारी सुरु करावी. रस्त्यावर बांधकाम करणाऱ्यास समज द्यावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, पाच फुटाची चर खोदल्याने पंचवीस कुंटुंबाची वाहने अडकली असून पायीच ती चर ओलाडूंन येजा करावी लागत आहे.