मनोज परबने दिली ग्वाही
प्रतिनिधी /मडगाव
गोव्याची ओळख नष्ट केली जात आहे. गोव्याचे अस्तित्व जपण्याची वेळ आली असून हा पर्याय केवळ आरजी देऊ शकतो व त्यासाठी रिव्होल्युशनरी गोवन्सने सर्वात अगोदर आपले उमेदवार घोषित केले आहेत. सर्व उमेदवार हे तरूण आहे. आज जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आह,s त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही. आरजीचा एकही उमेदवार फुटणार नाही. ते गोवेकरांसाठी कोणताही त्याग करण्यास तयार असतील अशी ग्वाही ‘आरजी’चे प्रमुख मनोज परब यांनी दिली.
गोंय, गोंयकार, गोंयकारपणच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतानाच भाजप सरकारला पाठिंबा देऊन, सत्तेत सहभागी होऊन विजय सरदेसाई यांनी गोवेकरांची पूर्ती वाट लावली. मडगावात मोंती डोंगर स्थापन केला तो दिगंबर कामत यांनी. आज या मोंती डोंगराची भीती सर्वांनाच वाटते, कधी खून होईल, कधी मारामारी होईल हे सांगता येत नाही. तेच दिगंबर कामत वय झाले तरी निवडणूक लढविण्यापासून मागे हटत नाही अशी जोरदार टीका या सभेत मनोज परब यांनी केली.
आज आरजीचे काही उमेदवार हे खलाशी असल्याची टीका होत आहे. पण, ते गोव्यात आले व या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे अशा टीकेला आम्ही महत्व देत नाही. आरजीच्या सभा रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहे. मात्र, जनतेच्या बळावर आरजीला कोणी रोखू शकणार नाही असे ते म्हणाले.
प्रत्येक गोवेकरांला काम-धंदा, उद्योग व्यवसाय असला पाहिजे, स्वताचे घर असावे, शिकणासाठी पैसा असला पाहिजे, जेवणात पुरेशी मासळी असली पाहिजे, गोव्यातील पर्यावरण जतन व्हायला पाहिजे व त्याच बरोबर देशात गोवा अव्वल क्रमांकावर असला पाहिजे व हेच आरजीचे उद्दिष्ठ असून ते घेऊन पुढे जात आहोत.
‘पोगो’ विधेयक व गोव्याच्या जमनी गोवेकारांसाठी राखून ठेवणे ही दोन प्रमुख विधयके संमत केली जाणार आहे. जर ही दोन विधयके संमत झाली तर गोवेकरांच्या असंख्य समस्या निकालात निघतील असा विश्वास मनोज परब यांनी व्यक्त केला. कचरा समस्या सोडविण्यास प्राधान्य, औद्योगिक धोरण, शैक्षणिक धोरण यावर देखील आरजी भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्याचे हित केवळ आरजीच सांभाळू शकेल, आपल्या भावी पिढीसाठी गोवा जतन करण्यासाठी आत्ता लोकांनाच क्रांतीकारी व्हावी लागले. त्यामुळे आगामी निवडणूक ही गोव्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे मतदारांनी निवडणुकीत कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन काल आर्लेम फातोर्डा-मडगाव येथील आरजीच्या जाहीर अन्य वक्त्यांनी केले.
या सभेत मनोज परब यांनी भाजपचे महामंत्री सतीश धोंड व प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यावर तुफान टीका केली. आज आरजीच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. पण, आम्ही अशा धमक्यांना भिक घालत नाही. उलट त्यांचे आव्हान आम्ही स्वीकारतो असे मनोज परब म्हणाले.
गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने काय केले हे जनतेसमोर आहे. पुढील दोन वर्षे जर या सरकारला मिळाली तर गोवा हा गोवेकरांसाठी शिल्लक राहणार नाही असे मत प्रियोळ मतदारसंघाचे उमेदवार विश्वेष नाईक यांनी व्यक्त केले.
आज गोव्यात अनेक राजकीय पक्ष आले आहे. त्यात बंगाल, दिल्ली व महाराष्ट्रातून राजकीय पक्ष आले आहे. ते गोवेकरांना नको असलेली आश्वासने देऊन गोवेकरांना भुलविण्याचा प्रयत्न करीत आहे. आज योजनाची घोषणा केली जाते पण, या योजना देणे शक्य होणार नाही. कारण गोव्यावर 23 कोटीचे कर्ज आहे. त्यातून कधी सुटका होईल हे कोणीच सांगत नाही.
गृह आधार योजना लोकांपर्यंत पोचत नाही. उलट झोपडपट्टीत राहणाऱया लोकांना योजनांचा लाभ मिळत आहे. लाडली लक्ष्मीचे पैसे मिळत नाही. केंद्रात व गोव्यात भाजप सरकार असून देखील या योजना लोकांना मिळत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. गोव्याला खास दर्जा देण्याची घोषणा अगोदर काँग्रेसने केली व नंतर भाजपने. पण, आज पर्यंत गोव्याला खास दर्जा मिळालेला नाही. विकासाच्या नावाखाली या ठिकाणी लुटमार चालू असल्याचा आरोप या सभेत करण्यात आला. या सभेला मोठय़ा संख्येने लोकांनी उपस्थिती लावली होती.