नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या घटनेने परिसरात हळहळ
प्रतिनिधी / कळंबा
नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मंदिरात आरती करीत असताना कळंबा (ता. करवीर) येथील दिगंबर कृष्णाजी कुलकर्णी ( वय 76) या पुजाऱ्याचे ह्लदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. नवरात्र उत्सवातील तिसऱ्या दिवशीच घडलेल्या या घटनेने कळंबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मयत कुलकर्णी हे गावातील ग्रामदैवत महालक्ष्मी मंदीरात देवीची आरती करीत होते. आज नवरात्र उत्सवाचा तिसऱ्या दिवस असल्याने देवीची पूजा करून सकाळी 11 च्या सुमारास ते आरती करत होते. यावेळी त्यांना आरती करताना अचानक अस्वस्थ वाटू लागले. स्थानिक डॉक्टरांकडून तपासणी करुन त्यांना कळंबा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचे ह्लदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शांत व मनमिळावू स्वभावामुळे दिगंबर यांच्या बद्दल ग्रामस्थांना आस्था होती. नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच अशा प्रेमळ व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.