प्रतिनिधी /बेळगाव :
यावषी पावसामुळे हंदिगनूर भागात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतातील पिके वाया गेली असून आम्हावर उपासमारीची वेळ आली आहे. तेंव्हा आम्हाला उद्योग खात्री योजनेतून कायम स्वरुपी काम द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी यावर्षी कुरिहाळ, मण्णिकेरी, हंदिगनूर, बंबरगा, घुगरेनट्टी, केदनूर या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी 150 दिवस काम देण्यात येत होते. आता 100 दिवस काम देण्यात येत आहे. त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुकादमांना याआधी 3 रुपये कमिशन देण्यात येत होते आता त्या कमिशनमध्ये वाढ करुन ते आता 5 रुपयांपर्यंत द्यावे याचबरोबर दररोज 100 रुपये वेतन देण्यात येत होते आता त्यामध्ये वाढ करुन ते 150 रुपये द्यावेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली.
यावेळी तालुका पंचायतच्या कार्यकारी अधिकाऱयांना भेटून त्यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आणि कामा देण्याची मागणी करण्यात आली. कार्यकारी अधिकाऱयांनी तातडीने काम देवू, असे आश्वासन दिले. यावेळी शिवबा एमेटकर, सुनिता अजानी, शिवबा कलखांबकर, परशराम पाटील, ताई बेळगावकर आदी उपस्थित होते.