आयएमएफच्या गीता गोपीनाथ यांचा इशारा :
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
देशविदेशात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा (एआय) वापर वाढत चालला आहे. कंपन्यांनी आता एआयवरच लक्ष केंद्रीत केले आहे. अशा स्थितीत भारतीय वंशाच्या प्रख्या अर्थतज्ञ आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रथम उपव्यवस्थापकीय संचालिका गीता गोपीनाथ यांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे आगामी काळात रोजगाराच्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहू शकतात. यामुळे धोरणकर्त्यांनी या तंत्रज्ञानाला नियंत्रित करण्यासाठी लवकरात लवकर नियम तयार करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
सरकार, संस्था आणि धोरणकर्त्यांनी नियमावली तयार करण्यासह रोजगाराच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्याची तयारी लवकरात लवकर करावी असे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे प्रभावित होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेला विचारात घेत सरकारांनी सोशल सेफ्टी नेट्सना चालना द्यावी. तसेच कर्मचाऱ्यांऐवजी यंत्रांचा वापर वाढेल अशाप्रकारचे प्रोत्साहन कंपन्यांना देण्यात येऊ नये. नव्या तंत्रज्ञानाप्रकरणी आव्हान देणे अशक्य ठरणाऱ्या कंपन्यांबाबत धोरणकर्त्यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे 30 कोटी पूर्णवेळ नोकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो असे गोल्डमन सॅक्सने स्वत:च्या अहवालात नमूद केले होते. तर पुढील तीन वर्षांमध्ये नवे तंत्रज्ञान आमची जागा घेऊ शकेल अशी भीती एक तृतीयांश लोकांना सतावत असल्याचे एका जागतिक सर्वेक्षणात दिसून आले होते.
तंत्रज्ञानाशी निगडित अनेक कंपन्या नियमित नोकऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजेन्ससोबत बदलण्याचा विचार करत आहेत. या कंपन्या 7800 पदांवरील नियुक्तीला स्थगिती देऊ शकतात. या पदांच्या जागी एआयचा वापर केला जाऊ शकतो.