शनिवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत निर्बंध : जिल्हाधिकाऱयांचा आदेश
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शनिवार दि. 22 रोजी सकाळी 6 पासून सोमवार दि. 24 रोजी सकाळी 6 पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता दोन दिवस केवळ औषध आणि दूध इतकेच नागरिकांना मिळणार आहे. लॉकडाऊन संपण्याच्या शेवटच्या टप्प्यातच हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आदेशपत्रक काढून विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. हॉस्पिटल, औषध दुकाने व दूध डेअरी वगळता इतर सर्व व्यवहार या काळात बंद राहणार आहेत. याबाबत पोलीस आयुक्तांना कठोर कारवाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. आंतरराज्य आणि आंतर जिल्हय़ामध्ये केवळ अत्यावश्यक माल वाहतूक वगळता इतर वाहतुकीवरही कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. दररोज हजारपेक्षाही अधिक रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढले असून आतापर्यंत कोरोनाने 404 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवारपासून सोमवारी पहाटेपर्यंत पूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत. कारण जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन काळातही सकाळी 6 ते 10 पर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुभा दिली होती. मात्र त्याचा गैरफायदा घेताना अनेकजण दिसत आहेत. मंगळवारी तर खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना जनता मात्र बेफामपणे रस्त्यावर उतरल्यामुळे या कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
कडक लॉकडाऊनमुळे आता पोलीस विनाकारण फिरणाऱयांना पुन्हा लाठीचा प्रसाद देण्यास प्रारंभ करणार हे निश्चित झाले आहे. केवळ दवाखान्यासाठी तसेच औषध खरेदीसाठी आलेल्या व्यक्तींनाच मुभा देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही कामांसाठी मुभा दिली जाणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान यापूर्वीच काही जिल्हय़ांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्य सरकारने आता जिल्हाधिकाऱयांकडेच लॉकडाऊन करण्याबाबतचा अधिकार दिल्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी तातडीने हा विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. 24 पर्यंत यापूर्वीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पुढील लॉकडाऊनबाबत चर्चा करूनच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई
आदेशाचे उल्लंघन करण्यांविरुद्ध भा. दं. वि. 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत अनावश्यकपणे रस्त्यांवर फिरणाऱयांवर कठोर कारवाई होणार आहे.