खरेदीसाठी गर्दी न करण्याचा नगराध्यक्षांचा सल्ला
प्रतिनिधी /काणकोण
कोरोना महामारीचा वाढता प्रभाव टाळण्यासाठी मागच्या जवळजवळ तीन महिन्यांपासून बंद असलेले चावडीवरील मासळी आणि भाजी मार्केट 23 पासून खुले करण्यात आले असून तसा आदेश नगराध्यक्ष सायमन रिबेलो आणि मुख्याधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी दिला.
मागच्या तीन महिन्यांपासून मासळी आणि भाजी मार्केट बंद असले, तरी नागरिकांना भाजी तसेच मासळी उपलब्ध व्हावी यासाठी वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन रस्त्याच्या बाजूला बसून विक्रेते आपला व्यवहार करत आले होते. मात्र सरकारने जे निर्बंध घालून दिलेले आहेत त्यांचे पालन करून पालिकेची दोन्ही मार्केट खुली करण्यात आली आहेत. त्यापूर्वी मासळी मार्केट आणि भाजी मार्केट परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले.
पालिकेच्या कामगारांनी दोन्ही मार्केटांची व्यवस्थित सफाई केली आहे. त्याचबरोबर मार्केटच्या प्रवेशद्वारावर आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही मार्केटमध्ये व्यवहार करणाऱया विक्रेत्यांनी कोरोना महामारीचा फैलाव टाळण्यासाठी सरकारने जे निर्बंध घालून दिलेले आहेत त्यांची काळजी घ्यायला हवी. पालिकेचे कर्मचारी या सर्व व्यवहारांवर नजर ठेवून असले, तरी नागरिकांनी या सूचनांचे काटेकारेपणे पालन करण्याची गरज नगराध्यक्ष रिबेलो यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
चावडीवरील भाजी आणि मासळी मार्केटवर कित्येकांचे संसार अवलंबून आहेत. ज्या व्यक्तीने सोपा कर गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्याच्याही भवितव्याचा विचार करायला हवा. शेवटी काळ आपल्यासाठी थांबत नाही. मात्र नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, प्रत्येकाने संयम पाळावा अशी कळकळीची विनंती आपण करत असल्याचे रिबेलो यांनी स्पष्ट केले.