तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु होण्याच्या मार्गावर आहे . परंतु हा कारखाना कोण चालविण्यासाठी घेणार. आणि जो कोणी व्यक्ती कारखाना चालविण्यासाठी घेणार. तो व्यक्ती कामगारांच्या थकित पगारी देणार? का फक्त आश्वासन देणार? किती कामगारांना कामावर ठेवणार? अन्यथा, आहे त्याच कामगारांची कपात करणार? या सर्व बाबींची समिक्षा करण्यासाठी व कामगारांची काय भुमिका असली पाहिजे, या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी सर्व कामगारांनी आदिनाथ सहकारी कारखान्याच्या आवारात समिक्षा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन करण्यासाठी, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष, दशरथ कांबळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळेस सर्व कामगारांनी यापुढील आदिनाथ कारखान्याचा लढा दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वात लढण्याचे एकमुखाने ठरविले आहे.
दशरथ कांबळे यांनी कामगारांना संबोधित करताना सांगितले की, आज तुमच्या चेहऱ्यावर हसुसुध्दा तुम्हाला नकली आणावे लागत आहे. तालुक्यामध्ये खुप सारे कामगारांचे, शेतकऱ्यांचे नेते फिरत आहेत. परंतु या किती लोकांनी तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी तुमची भेट घेतली आहे. कामगार आणि शेतकऱ्यांची आठवण फक्त निवडणुकीच्या वेळेसच येते. परंतु तुम्हाला मी जोपर्यंत न्याय मिळवून देणार नाही. तोपर्यंत शांत बसणार नाही. कारण मी राजकारणी, अथवा राजकारण करणारा व्यक्ति नाही. असे कांबळे यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, कारखान्यामध्ये करोडो रुपयांची साखर पडलेली असताना, फक्त राजकारणापोटी आणि स्वार्थापोटी साखरेची विक्री केली जात नाही. प्रत्येक कामगाराचे कारखान्याने प्रत्येकी १५ लाख रु. देणे आहे. हे सर्व देणे व कारखान्यावरील कर्ज कारखान्यातील सर्व साखरेची विक्री करुन देता येईल. परंतु संचालकांना तसे करायचे नाही. असे स्पष्ट दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसात आदिनाथ कारखाना चालविण्यासाठी कोण घेईल. याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. परंतु कारखाना सुरु करण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने प्रथम कामगारांच्या पगारीचा प्रश्न मिटवावा व नंतरच कारखान्यात पाऊल ठेवावा, अन्यथा सर्व कामगारांसोबत मी उभा राहुन कारखाना चालविण्यासाठी येणाऱ्या व्यक्तिस कारखान्यात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
कामगारांच्या विविध मागण्यांसाठी व थकित सर्व पगारी लवकरात लवकर मिळाव्या. यासाठी २० जानेवारीला नगर-सोलापूर हायवेवर आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाळवणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा ठराव एकमुखाने सर्व कामगारांनी मंजुर केला.
या बैठकीसाठी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सर्व कामगार, सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.