जिल्हाधिकाऱयांबरोबर म. ए. समितीच्या नेत्यांनी केली चर्चा, मोर्चा काढण्याचा निर्धार कायम
प्रतिनिधी /बेळगाव
भाषिक अल्पसंख्याक आयोग, न्यायालय आणि सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करून आम्हाला त्रिसूत्री भाषांमध्ये परिपत्रके, चौकातील फलक, महानगरपालिकेतील फलक, कागदपत्रे द्यावीत, असा आग्रह मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकाऱयांकडे केला. त्यावर जिल्हाधिकाऱयांनी 15 दिवसांत हे फलक बसविले जातील, असे आश्वासन दिले. तसेच मोर्चा काढू नका, अशी विनंती केली. मात्र अनेकवेळा मागणी करूनही पूर्तता केली नाही. त्यामुळे मोर्चा काढला जाईलच, असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस उपायुक्त विक्रम आमटे, महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी समितीच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी समितीच्या नेत्यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत दिली. आम्ही कायद्यानुसार आमचा हक्क मागत आहे. आम्हाला तो द्यावा, असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सर्व कागदपत्रे पाहून निश्चितच तिन्ही भाषांमधील फलक उभे करू, असे आश्वासन दिले. यावेळी मनपा आयुक्त रुदेश घाळी यांना आदेशाचे वाचन करून तुम्ही कामाला लागा, असे सांगितले.
पोलीस उपायुक्तांनाही पोलीस स्थानकामध्ये मराठी भाषिकांना निर्माण होणाऱया अडचणी सांगितल्या. फिर्याद दाखल करताना किंवा मराठीत बोलताना प्रथम कन्नडमध्ये बोला असे सांगितले जाते, हे अत्यंत चुकीचे आहे. सीमाभागामध्ये 15 टक्क्मयांपेक्षा अधिक मराठी भाषिक राहतात. त्यामुळे कायद्यानुसारच सर्व कागदपत्रे व फलक तिन्ही भाषांमध्ये लावावेत, असे सांगण्यात आले.
आमचा कन्नडला विरोध नाही. प्रथम कन्नड लिहा, त्यानंतर मराठी आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये लिहा. आम्ही कोणत्याही भाषेला विरोध करणार नाही. मात्र आमचे हक्क आम्ही आजपर्यंत मागत आलो आहे. त्याची पूर्तता करणे हे तुमचे काम आहे, असे सांगण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी 15 दिवसांत आम्ही हे करू, मात्र मोर्चा काढू नका, अशी विनंती केली. त्यावर मोर्चा हा निघणारच आहे, असे समिती नेत्यांनी सांगितले.
या बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, ऍड. राजाभाऊ पाटील, रणजीत चव्हाण-पाटील, महेश जुवेकर आदी उपस्थित होते.