कारवार किनारपट्टीवरील तालुक्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ : अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली : गोकर्ण देवालयातील गर्भगुढीत शिरले पाणी
प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संततधार आणि मुसळधार कोसळणाऱया पावसामुळे किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनारपट्टीवरील सखल प्रदेशात पाणीच पाणी झाल्याने किनारपट्टीला प्रतिसमुद्राचे स्वरुप प्राप्त झाले आहे. धुवांधार पावसामुळे किनारपट्टीवरील अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून ठिकठिकाणी वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला आहे.
गुरुवारीही किनारपट्टीवरील तालुक्यात पाऊस विश्रांती घेण्याच्या मनस्थितीत नसून हवामान खात्याने वर्तविलेला शुक्रवारचा अंदाज खरला ठरला तर किनारपट्टीवरील तालुक्यातील परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. किनारपट्टीवरील कृषीभूमीत मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्याचबरोबर समुद्र किनाऱयालगत पारंपरिक पद्धतीने करण्यात येणारी मासेमारीही ठप्प झली आहे.
कुमठा तालुक्यातही जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र गोकर्ण येथील महाबळेश्वर देवालयाच्या गर्भगुढीत गुरुवारी सकाळी काही काळ पाणी साचले होते. परिणामी श्रीच्या दैनंदिन पूजा, अर्चा कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाला होता. मंदिराच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा योग्य त्या रितीने निचरा होत नसल्यामुळे गर्भगुढीत प्रत्येक वर्षी पाणी साचण्याच्या घटना घडत असतात असे सांगण्यात आले.
दरडी कोसळण्याचे प्रकार
होन्नावर तालुक्यातील हडीनबाळ ग्रा. पं. च्या काऊर येथील शाळेच्या कंपाऊंडजवळ दरड कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने सैनिकी सेवा बजावणाऱया सुरेश गौडा यांच्या घरावर दरड कोसळण्याची घटना टळली आहे. गेल्या वर्षीही अशीच घडली होती. महसूल खात्याच्या अधिकाऱयांकडे याबद्दल दाद मागितली असता पंचनामा आणि फोटो कार्यक्रमाच्या पलीकडे अधिक काही पदरात पडले नाही, असा आरोप सैनिक सुरेश गौडा यांनी केला आहे.
घाटमाथ्यावरील तालुक्यातही जोरदार पाऊस
दरम्यान, जिल्हय़ाच्या घाटमाथ्यावरील तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. सिद्धापूर 113 मि.मी., शिरसी 96 मि.मी., जोयडा 71 मि.मी. आणि यल्लापूर तालुक्यात 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हय़ाच्या घाटमाथ्यावरील तालुक्यासह गोवा राज्याच्या पूर्व भागात, बेळगाव जिल्हय़ातील खानापूर तालुक्यात आणि शिमोगा जिल्हय़ातील सागर, सोरब आदी तालुक्यात जोरदार पाऊस होत असल्याने कारवार जिल्हय़ातील धरणांच्या पाण्याच्या पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. काळी नदीवरील गणेशगुढी (सुपा) जलाशयात सुमारे 34 हजार क्युसेक पाणी वाहून येत आहे. शरावती नदीवरील लिंगनमक्की जलाशयात सुमारे 48 हजार क्युसेक इतके पाणी वाहून येत आहे. गेल्या वर्षी आजअखेर गणेशगुढी जलयाशयातील पाण्याची पातळी 533 मीटर इतकी होती. यावर्षी ही पातळी 540 मीटर इतकी झाली आहे. गेल्या वर्षी आजअखेर लिंगनमक्की धरणातील पाण्याची पातळी 1766 फूट इतकी होती. यावर्षी ही पातळी 1788 फूट इतकी झाली आहे.
कोणत्याही नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही
दरम्यान, जिल्हय़ातून वाहणाऱया काळी, शरावती, वरदा, गंगावळी आणि अघनाशिनी या पाच प्रमुख नद्यांपैकी कोणत्याही नदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. गेली दोन वर्षे झालेल्या पावसात या नद्यांनी हैदोस आणि हाहाकार माजविला होता. जिल्हा प्रशासन आणि अन्य यंत्रणा या नद्यांच्या पातळीवर करडी नजर ठेऊन असल्याचे सांगण्यात आले.