परतीच्या पावसाने शेती उत्पादनावर परिणाम : पितृ पंधरवडय़ामुळे भाजीपाला मागणीत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
परतीच्या पावसाने भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजविल्याने शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे. विशेष करून भाजीपाल्याला फटका बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊन दरात वाढ झाली आहे. शनिवारी किरकोळ बाजारात कारली, गवार, बिन्स, वांगी, टोमॅटो आदी भाज्यांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. पितृ पंधरवडय़ामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली असून भाज्यांचे देखील दर वाढल्याने नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
शनिवारच्या आठवडी बाजारात कारली 60 रु. किलो, गवार 80 रु. किलो, बिन्स 60 रु. किलो, वांगी 60 रु. किलो, टोमॅटो 30 रु. किलो, मेथी 15 रु. एक पेंढी, पालक 10 रुपयाला 2 पेंढय़ा, कोथिंबीर 10 रु. एक पेंढी, दोडकी 40 रु. किलो. लाल भाजी 10 रुपयाला 2 पेंढय़ा, कांदापात 10 रु. 3 पेंढय़ा, गाजर 30 रु. किलो. शेवग्याच्या शेंगा 20 रु. पेंढी, शेपू 20 रुपयाला 3 पेंढय़ा, ओली मिरची 20 रुपये किलो, फ्लॉवर 20 रु. ला 1, कोबीज 10 ला 1, भेंडी 30 रु. किलो, काकडी 60 रु. किलो, आले-लसूण 100 रु. किलो, कांदे 25 ते 30 रु. किलो, बटाटा 25 ते 30 रु. किलो, रताळी 25 ते 30 रु. किलो दराने विक्री सुरू होती.
बटाटा – रताळय़ांची विक्री
मागील काही दिवसांपासून तालुक्मयात बटाटा रताळी काढणीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात स्थानिक बटाटा आणि रताळय़ाची विक्री होताना दिसत आहे. बटाटा व रताळी 25 ते 30 प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. विशेष करून सध्या लाल बटाटय़ालाच मागणी अधिक आहे.
लिंबूची आवक वाढली
ऑक्टोबर हिट सुरू झाल्याने शरीराला थंडावा देणाऱया पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात लिंबूंची आवक वाढलेली पहायला मिळाली. तसेच वाढत्या उन्हामुळे लिंबूंच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. 10 रुपयाला 5 नग अशी लिंबूंची विक्री सुरू होती.