मत्स्य खात्याचा उपक्रम, मत्स्य संवर्धनासाठी होणार मदत
प्रतिनिधी /बेळगाव
मत्स्य उत्पादन आणि मत्स्य संवर्धनासाठी मत्स्य खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हय़ातील विविध तलावांतून यंदाच्या हंगामात लाखो मत्स्यबीज सोडण्यात आले आहे. याबरोबरच शहराचे सौंदर्य वाढविणाऱया किल्ला तलावात लवकरच 25 हजार मत्स्यबीज सोडण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य विभागाने दिली.
शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या किल्ला तलावात कटला, राहू, गिरमल, मृगळ जातीचे मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. त्यामुळे माशांचे संवर्धन होण्याबरोबर उत्पादनात वाढ होणार आहे. या बरोबरच पाण्यातील किड कमी होऊन पाणी शुद्ध राहण्यास मदत होणार आहे. गतवषीदेखील किल्ला तलावात मत्स्य खात्यामार्फत 20 हजार मत्स्यबीज सोडण्यात आले होते. यंदा त्यात 5 हजारांनी वाढ झाली असून 25 हजार मत्स्यबीज सोडले जाणार आहे. जिल्हय़ातील धरणक्षेत्रांबरोबर विविध तलावांतून विविध जातीचे मत्स्यबीज सोडण्यात आले आहे. जून ते ऑगस्टदरम्यान जिल्हय़ात 9,83,000 मत्स्यबीज पाण्यात सोडण्यात आले आहे. खात्यामार्फत हिडकल, राकसकोप व इतर धरण क्षेत्रात तब्बल 8 लाख मत्स्यबीज सोडले गेले आहे. खात्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू असून शहरासह इतर लहान तलावांतूनही मत्स्यबीज सोडले जात आहे.