विशेष प्रतिनिधी/ देवरुख
भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना चुकीच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये डांबून ठेवण्यात आले आहे. त्यांची सुटका व्हावी, यासाठी सोमवारी कालभैरव जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या आई वडिलांनी संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील पुरातन, जागृत श्री कालभैरव जोगेश्वरी भैरी भवानी मंदिरात दर्शन घेत देवाला साकडे घातले.
कुलभूषण हे 2001 साली भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर काही वर्षे इराणमध्ये व्यवसाय करत होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या दाव्यानुसार 2016 साली इराणमधून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर ते पाकिस्तानमध्ये आढळले तर पाकिस्तानच्या दाव्यानुसार दहशतवाद व भारताच्या गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी करताना त्यांना पाकिस्तानच्या बलुचीस्तानमधून अटक करण्यात आली होती. यानंतर दोन्ही देशांकडून दावे-प्रतिदावे सुरू असले तरीही कुलभूषण यांना पाकिस्तानने डांबून ठेवले आहे. पाकिस्तानच्या दाव्यानुसार पाकमधील विध्वंसक कारवाईमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यानंतर भारताने त्यांना माजी नौदल अधिकारी म्हणून मान्यता दिली, मात्र सध्याचे देशासोबतचे त्यांचे संबंध नाकारले होते. दरम्यान 10 एप्रिल 2017 साली पाकिस्तानमधील फिल्ड जनरल कोर्ट मार्शलने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताच्या पाठपुराव्यानंतर 18 मे 2017 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या फाशीला स्थगिती दिली होती, मात्र जाधव यांच्या सुटकेचे अपील फेटाळून लावण्यात आले. दरम्यान अनेक वर्षांनी कुलभूषण यांना त्यांच्या आई-वडिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्या आई-वडिलांना त्यांची भेट झालेली नाही.
सोमवारी श्री कालभैरव जन्मोत्सवाचे औचित्य साधून त्यांचे वडील सुधीर दत्ताराम जाधव आणि आई अवंती जाधव यांनी संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील पुरातन जागृत असलेल्या श्री देव कालभैरव जोगेश्वरी भैरी भवानी मंदिरात येत देवाचे दर्शन घेत आपल्या मुलाच्या सुटकेचे साकडे घातले. यावेळी देवस्थान समितीतर्फे विश्वस्त भालचंद्र खातू व अन्य विश्वस्तांनी त्यांचा आदर-सन्मान केला व त्यांच्यासोबतच कुलभूषण यांच्या सुटकेसाठी देवाकडे प्रार्थना केली.