तरुण भारत संवाद बोरगाव दे. / वार्ताहर
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील राजशेखर धुळप्पा निंबाळे यांचे चिरंजीव समर्थ (वय 20) हे कॉलेजच्या सहलीसाठी कुलूमनाली येथे गेले होते. तिथे हृदयविकाराचा झटका येऊन बुधवारी पहाटे मृत्यू झाला.
ते जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी. एस्सी ऍग्रीच्या दुसऱया वर्षात शिकत होते. त्यांच्या कॉलेजची सहल कुलूमनाली येथे गेली होती. तेही मित्रांसोबत यात सहभागी झाले होते. कुलूमनाली येथे अतिथंड हवामान असल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वागदरीचे प्रगतशील शेतकरी धुळप्पा निंबाळे यांचे ते नातू होते. समर्थचे वडील राजशेखर निंबाळे हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा येथे पोलीस हवालदार म्हणून नेमणुकीस आहेत.
समर्थ निंबाळे हे 19 जानेवारीला रेल्वेने हिमाचल प्रदेशातील कुलूमनाली या थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी गेले होते. तेथे एक दिवस फिरले. सकाळी 11 वाजता समर्थ निंबाळे याला अस्वस्थता जाणवू लागली. त्यामुळे सोबत असणाऱया शिक्षकांना ही गोष्ट सांगितली आणि प्राथमिक उपचार घेतल्याने बरे वाटले. रात्री आई-वडिलांना फोनवरून प्रकृती बरी असल्याचेही कळविले. दुसऱया दिवशी सकाळी मनाली या ठिकाणी फिरायला गेले. मनाली हे कुलूपासून 80 कि. मी. वर आहे. मनाली येथे पोहोचल्यानंतर परत अस्वस्थता जाणवू लागली. हृदयात खूपच त्रास सुरू झाला. सायंकाळ झाली होती. बाहेर हिमवृष्टी होत होती. रस्त्यावर बर्फवृष्टी होऊ लागली. डॉक्टर आणि रुग्णवाहिकेस संपर्कही केला. पण बर्फवृष्टीमुळे रुग्णवाहिका येण्यास उशिर झाला. रात्री अकराच्या दरम्यान रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेत घालून मनालीच्या रुग्णालयात समर्थला घेऊन जाण्यात आले. तोपर्यंत खूप उशिर झाला होता. डॉक्टर तपासणी केली. तपासणीपूर्वीच समर्थची प्राणज्योत मावळली.
हिमवृष्टीमुळे मृतदेह आणण्यात अडथळे
शवविच्छेदन करून गुरुवारी सायंकाळी मनालीहून खाजगी रुग्णवाहिकेने चंदिगढ येथे मृतदेह आणण्यात येत आहे. हिमवृष्टीमुळे कुलूमनाली येथील रेल्वे व विमान सेवा बंद आहे. समर्थ निंबाळे यांचा मृतदेह सोबत गेलेले शिक्षक घेऊन येत आहेत. शुक्रवारी सकाळी पुण्यात पोहोचेल आणि पुण्याहून वागदरी येथे दुपारी चार वाजता पोहोचेल. त्यानंतर एक तास राहत्या घरी समर्थ निंबाळे यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.