ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शेतकरीविरोधी कायदा हटविण्यात यावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज 6 महिने पूर्ण झाले. त्यानिमित्त आज ‘काळा दिवस’ पाळला जात आहे.
दरम्यान, कोरोना संकटकाळात संयुक्त किसान मोर्चाने नव्या कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर अनेकांनी आपल्या घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून पाठिंबा दर्शविला आहे.
- टिकरी बॉर्डरवर काळे झेंडे
टिकरी बॉर्डरवर देखील शेतकऱ्यांनी काळे झेंडे लावले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळावर तिरंगा, किसान मोर्चाचा झेंडा आणि काळा झेंडा असे तिन्हीं झेंडे फडकावले आहेत.
- अमृतसर : छब्बा गावात लोकांनी घरावर फडकावले काळे झेंडे
अमृतसरमधील छब्बा गावातील लोकांनी कृषी कायद्याला विरोध दर्शवत आपल्या घरावर काळे झेंडे फडकावले आहेत. हे झेंडे आंदोलकर्त्यांनी केलेल्या आव्हानाला पाठींबा दर्शविण्यासाठी लावले आहेत.
- राकेश टीकैत म्हणाले..
भारतीय किसान युनियनचे नेते राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टीकैत यांनी सांगितले की, ‘नव्या कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यास शेतकरी तयार आहेत. आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारदरम्यान 11 बैठका पार पडल्या, पण कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आम्ही काळ्या झेंड्यासह तिरंगा देखील घेतला आहे. सहा महिने झाले तरी सरकार आमचे म्हणणे ऐकत नाही आहे त्यामुळे आम्हाला काळे झेंडे घ्यावे लागत आहेत. आम्ही सर्व गोष्टी शांततेने करीत आहोत. तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन यावेळी केले जात आहे. शेतकरी नेत्यांनी केलेल्या आवाहनाला पंजाबमधील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवत आपल्या घरावर तसेच ट्रॅक्टरवर काळे झेंडे लावले आहेत.
- सिंधू – टिकरी बॉर्डर वरील सुरक्षेत वाढ
दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सिंधू – टिकरी, गाझियाबाद बॉर्डरवर तसेच अन्य आंदोलन स्थळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.