प्रतिनिधी / मिरज
सलग दोन दिवस पडणारा संततधार पाऊस आणि कोयना धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णानदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मिरज कृष्णाघाटावर बुधवारी सहा फुटांनी तर आज सायंकाळपर्यंत अकरा फुटांनी पाणी पातळी वाढली. 24 तासात 17 फुटांनी पाणी पातळीत वाढ झाली. धोका पातळी 51 फुटांपर्यंत असून, सध्या 43.6 फुटांपर्यंत पाणी पोहचले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या कोयना धरणातून 33 हजार, 921 क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे. त्यातच पाऊसही थांबण्याचे नांव घेत नसल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. बुधवारी पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे कृष्णाघाटावर सहा फुट पाणी वाढले. तर गुरूवारी दुपारी बारापर्यंत पाच फुटांची भर पडली. आलमट्टीतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने धोका नाही. मात्र, सततचा पाऊस, कोयनेचा विसर्ग यामुळे वाढणारी पाणी पातळी चिंतेचा विषय आहे.