ईएसआयसी सदस्यांवरील अवलंबित्वावर मिळणार मदत ः कामगार मंत्रालयाने मागविल्या सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाकाळात कामगार मंत्रालयाने ईएसआयसी सदस्यांना काही प्रमाणात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर ईएसआयसी सदस्यांवर अवलंबून असलेल्यांना किमान 1800 रुपयांचे पेन्शन दर महिन्याला मिळणार आहे. यासंबंधी कामगार मंत्रालयाने अधिसूचना काढून योजनेसंबंधी एक महिन्याच्या कालावधीत सूचना करण्यास सांगितले आहे.
एम्प्लॉइज स्टेट इन्शोरन्स कॉर्पोरेशनने ईएसआयसी कोविड-19 रिलीफ स्कीमला अधिसूचित केले आहे. ही योजना ईएसआयसी कायद्याच्या कलम 19 अंतर्गत अधिसूचित करण्यात आली आहे. योजनेच्या अंतर्गत कोविड-19 ने आजारी व्यक्तीच्या मृत्यूवर दिलासा उपाययोजनांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेच्या अंतर्गत संबंधित व्यक्ती कोरोनाबाधित आढळण्याच्या किमान 3 महिने पूर्वी ईएसआयसीच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
…नोकरीवर असावा
योजनेचा लाभ मिळावा याकरता मृत व्यक्ती संक्रमित आढळण्यावेळी नोकरीवर असणे आवश्यक आहे. तसेच एक वर्षाच्या कालावधीत किमान 70 दिवसांसाठी ईएसआयसीसाठी योगदान केलेले असावे. अधिसूचनेनुसार मृत सदस्याच्या योग्य कौटुंबिक सदस्याला दिलासा निधी थेट बँके खात्यातून मिळणार आहे. योग्य लाभार्थींमध्ये पत्नी, 25 वर्षांपर्यंतचे वैध किंवा दत्तक अपत्य आणि विधवा आई सामील आहे.
सरासरी दैनिक वेतनाच्या 90 टक्के
योजनेच्या अंतर्गत आजारी व्यक्तीच्या मृत्यूवर दिलाशादाखल सरासरी दैनिक वेतनाच्या 90 टक्के रक्कम दर महिन्याला कुटुंबाच्या सदस्यांना मिळणार आहे. यात पत्नीला एकूण दिलासा निधीच्या 5 पैकी 3 हिस्स्यांइतकी रक्कम दर महिन्याला हयातभर मिळणार आहे. तर वैध किंवा दत्तक अपत्यांना 25 वर्षे वय होईपर्यंत रकमेतील दोन पंचमांश हिस्सा मिळणार आहे. कोरोना संसर्गमुक्त झाल्याच्या 30 दिवसांच्या आता मृत्यू झाल्यासही या योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे.
उपचारादरम्यान मिळणार वेतन
ईएसआयसी कायद्याच्या अंतर्गत विमाधारक कर्मचाऱयांना आजाराच्या उपचारादरम्यानही वेतन मिळण्याची तरतूद आहे. अशाच प्रकारे कोविडच्या उपचारादरम्यानही कर्मचाऱयांना वेतन दिले जाणार आहे. हे वेतन सरासरी दैनिक वेतनाच्या 70 टक्के रक्कम दैनंदिन हिशेबाने देण्यात येणार आहे. कायद्याच्या अंतर्गत विमाधारक कर्मचाऱयाला एक वर्षात कमाल 91 दिवसांच्या उपचारादरम्यान वेतन देण्याची तरतूद आहे. याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱयाला नामनिर्देशित शाखेत दावा करावा लागतो. या दाव्यावर 7 दिवसांत निर्णय घेतला जातो. दाव्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अंत्यसंस्कारासाठी 15 हजार रुपये
विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूवर त्याच्या अंत्यसंसकारासाठी ईएसआयसीकडून 15 हजार रुपयांची रक्कम देण्यात येते. ईएसआयसी कायद्याच्या अंतर्गत मृत्यूच्या दिवशी कर्मचारी विम्याच्या सुरक्षेत असावा. यासंबंधीचा दावाही 7 दिवसात निकालात काढला जातो.