गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची मागणी : लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांची समिती नेमावी
प्रतिनिधी / मडगाव
‘भिवपाची गरज ना’ असा संदेश लिहिलेले मास्क घातले म्हणून सरकारच्या गोव्यातील कोसळलेल्या कोविड व्यवस्थापनावर मास्क (पांघरुण) पडू शकणार नाही. हे ढासळलेले व्यवस्थापन जर जाग्यावर आणायचे असेल, तर ताबडतोब सर्व पक्षांच्या आमदारांना बरोबर घेऊन उपाययोजनेचा आराखडा तयार करा आणि स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती नेमा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
आपल्या व्हिडीओ संदेशातून सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सल्ला देताना गोव्यात कोविडमुळे 37 जणांना मृत्यू आला आहे, याकडे लक्ष वेधले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जे वेगळय़ा व्याधींमुळे दाखल होत आहेत ते बाहेर पडताना कोविडबाधित होतात. गोव्यात शंभर चाचण्यांमागे दहा जण पॉझिटिव्ह आढळून येतात. ही सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेले कर्मचारी ‘भिवपाची गरज ना’ असे लिहिलेले मास्क वापरतात. ही या मृतांच्या नातेवाईकांची थट्टा का, असा सवाल त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ताब्यातील खात्याकडून गैरव्यवस्थापन
कोविड इस्पितळातील स्थिती अगदी हलाखीची आहे. या इस्पितळाचे प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली असलेले मानव संसाधन विकास खाते सांभाळत आहे. यावरून मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या खात्याकडूनच गैरव्यवस्थापन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या मडगावच्या डॉक्टर आयरा आल्मेदा, आरोग्य सचिव, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री या चौकडीने चालविलेल्या गैरव्यवस्थापनामुळेच गोवेकरांचे आरोग्य धोक्मयात आले आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.
भाजप प्रवक्त्यांच्या दाव्यात तथ्य नाही
एका दिवसाच्या विधानसभा अधिवेशनासंदर्भात बोलताना सरदेसाई म्हणाले की, या एका दिवसाच्या अधिवेशनाला विरोधी पक्षांची मान्यता होती असा दावा भाजप प्रवक्त्यांनी केला आहे. या दाव्यात तथ्य नसून एकाच दिवसात एवढी सारी विधेयके संमत करणे आणि एकाच दिवसात अंदाजपत्रक संमत करणे विरोधकांनी मान्य केले नव्हते. यावेळी केवळ लेखानुदान संमत करा आणि अंदाजपत्रक कालांतराने चर्चा करून संमत करूया अशी भूमिका आम्ही मांडली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. अधिवेशनात चर्चेच्या वेळी विरोधक नव्हते यावर काही वृत्तपत्रांनी आक्षेप घेतला आहे. पण अधिवेशनात हजर राहिलो असतो, तरी आम्हाला आमच्या हरकती मांडण्यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. कारण या आशयाचा ठराव पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी मांडला होता. कोविडवर चर्चा व्हावी ही आमची मागणी होती. ही महत्त्वाची मागणी मान्य होत नसल्यामुळेच आम्ही निषेध करण्यासाठी खाली उतरलो, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.