मनीषा सुभेदार / बेळगाव
मराठी भाषा टिकण्यासाठी, मराठी शाळासुद्धा टिकणे व मराठी व्यवहारात वापरणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आणि सर्वत्र मराठी शाळांचे अस्तित्व टिकण्यासाठी ‘मराठी’ म्हणवून घेणाऱया प्रत्येकाची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी धडपडताना या शाळांच्या सदिच्छा दूत म्हणून चिन्मयी सुमीत यांचे काम महत्त्वाचे आहे. अभिनेत्री, सेलिब्रेटी या वलयांच्या पलीकडे जाऊन त्यांचे काम सुरू आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने त्यांची ही विशेष मुलाखत…
प्रश्नः- मराठी भाषा टिकविण्यासाठी मराठी शाळांचे अस्तित्व टिकणे किती महत्वाचे आहे.
ः- आपण महाराष्ट्रात राहतो व महाराष्ट्राची राज्य भाषा मराठी आहे. तीच आपल्या व्यवहाराची भाषा असायला हवी. मातृभाषेतूनच शिक्षण घ्यावे, असे महाराष्ट्रातील किंवा देशातील नव्हे तर जगभरातील मानसशास्त्रांचे म्हणणे आहे. जी घरातील भाषा आहे, तीच भाषा ते मूल शाळेत शिकणार. अर्थातच त्याचा जास्त वापर होणार. मुलांचे शिक्षण आनंददायी होण्यासाठी मातृभाषेतच शिक्षण घ्यायला हवे. मूल शाळेत जाते तेव्हा एक नवीन संकल्पना शिकणे व दुसरी भाषा शिकणे, असा दुहेरी ताण त्याच्यावर असतो.
आपण त्यापैकी त्याचा एक ताण तरी कमी करू शकतो. तो म्हणजे घरातील जी भाषा व्यवहाराची आहे, काऊ-चिऊची आहे, बोबडय़ा मुलांच्या गाण्यांची आहे त्याच भाषेत मूल शिक्षण घेते. जी भाषा त्याच्या कानावर पडत असते तेव्हा ती त्याच्या माहितीची भाषा असते. त्यामुळे मूल सहज शिक्षण घेऊ शकते आणि शिक्षण सहज व आनंददायी होण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. केवळ मराठी जगण्यासाठीच नव्हे तर मुलांचे शिक्षण आनंददायी होण्यासाठीसुद्धा मराठी शाळांचे अस्तित्व टिकणे व मातृभाषून शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. जेव्हा संकल्पना स्पष्ट होतात तेव्हा विचार मांडताना त्यांचा आधार घेतला जातो व व्यवहारात तीच भाषा प्रचलित होते. इंग्रजी माध्यमातील मुले मराठी बोलत असली तरी बऱयाचदा तांत्रिक गोष्टी सांगताना पटकन इंग्रजीत सांगतात. भाषा व्यवहारात येण्यासाठी ती भाषा शिक्षणात येणे महत्त्वाचे आहे.
प्रश्नः- मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सरकार उदासीन आहे का?
ः- इतिहास असा आहे, की महाराष्ट्राने अनेक सशक्त नेते देशाला दिले आहेत. महाराष्ट्र काही उपेक्षित, दुबळे राज्य नाही तर विचारवंतांचे, साहित्यिकांचे पुरोगामी राज्य आहे. असे असताना अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करताना आपला आवाज का क्षीण झाला? हे न उलगडणारे कोडे आहे. सध्या समाजामधून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी रेटा वाढतो आहे. त्यामुळे शासन उदासीन आहे, असे म्हणता येणार नाही. कारण दबाव निर्माण करणारे वातावरण असून त्याची चर्चाही अधिक होते आहे. मुख्य म्हणजे अभिजात दर्जा देण्याच्या निकषावर मराठी तंतोतंत उतरते. त्यामुळे राज्य सरकार आता काही प्रयत्न करेल, असे दिसते. फार दिरंगाई मात्र चांगली नाही.
प्रश्नः- मराठी माध्यमांमध्ये मुलांना शिकवणे अप्रति÷sचे आहे, अशी पालकांची मानसिकता आहे का?
ः- मी असे म्हणेन, इंग्रजी शाळांमध्ये पाठविणे प्रति÷sचे असे पालकांना वाटते. इंग्रजीमुळे मुलांचा न्यूनगंड कमी होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी येऊन ते विकसित होईल, असा पालकांचा समज आहे. परंतु इंग्रजी शाळेत शिकणे आणि इंग्रजी भाषा शिकणे यामध्ये फरक आहे. त्यामुळे मातृभाषेच्या आग्रहासाठी पालकांचे शिक्षण होणे गरजेचे आहे. अनेक इंग्रजी भाषेतील गटचर्चा, मुलाखतींमध्ये मराठी मुले कमी पडली, असा एक अपप्रचार केला जातो. वास्तविक विषय किती अवगत आहे हे पडताळले जाते. तेव्हा आकलनासाठी मातृभाषाच अधिक पूरक ठरते. अलीकडे युपीएससीच्या परीक्षा मातृभाषेतून देण्याची सोय आहे. त्यामुळे हिंदीमधून परीक्षा देऊन अनेक तरुण यश मिळवत असताना मराठी मुलांनी पण तसा प्रयत्न करायला हवा. दुसरे म्हणजे ज्यांनी अशा परीक्षा दिल्या आहेत त्यांनी स्वतःचा अनुभव सांगायला हवा आणि माध्यमांनीही अशा तरुणांना प्रसिद्धी द्यायला हवी.
इंग्रजी भाषा मला स्वतःला आवडते; पण ती व्यवहाराची भाषा आहे. युरोपियन देशामध्ये भाषेबद्दल खूप जागरुकता दिसते. हे देश त्यांची भाषा वापरतात व इंग्रजीचे प्रस्थ नाकारतात. फक्त आपल्या देशामध्ये तुम्ही किती सफाईदारपणे इंग्रजी बोलता यावर प्रति÷ा अवलंबून असेल तर पालकांनी विचार करायला हवा. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ इंग्रजी माध्यम नव्हे तर सीबीएसई व आंतरराष्ट्रीय शाळांना जाणे म्हणजे प्रति÷sचे असे म्हणत दर्जेदारपणाच्या नावाखाली मनपाच्या हक्काच्या शाळा सीबीएसईमध्ये परावर्तीत करण्यात येत आहेत. सीमाभागातही तो प्रयोग होऊ शकतो, याची मला भीती आणि काळजी वाटते. कारण जे महाराष्ट्रात होते ते उर्वरित प्रांतांमध्येसुद्धा होते.
प्रश्नः- मराठी शाळांच्या सदिच्छा दूत म्हणून काम करतानाचा अनुभव कसा आहे?
ः- आम्ही माझ्या निरद व दिया या दोन्ही मुलांना मराठी शाळेत का पाठविले? याचे कारण सांगणारा अनुभव सोशल मिडियावर व्यक्त केला. त्याला 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मुलांना मराठी की इंग्रजी शाळेत पाठवावयाचे? असा प्रश्न पालकांना पडतो. तेव्हा ते संपर्क साधतात. या निमित्ताने अनेक दुर्गम शाळा मला पाहता येतात. खूप उत्तम असे प्रयोगशील काम सरकारी शाळांमध्ये सुरू आहे. त्यामुळेच मी त्याचा प्रसार आणि प्रचार करते तेव्हा छान वाटते. परंतु सरकार दरबारी मात्र आम्हाला उभे राहू दिले जात नाही. मराठी भाषेसंदर्भात, शाळासंदर्भात काम करणारे कार्यकर्ते काही व्यथा किंवा समस्या सांगण्यासाठी जातात, तेव्हा सरकार त्या ऐकणे, त्यांना कान देणे हे मंत्री, सरकार आणि सचिव यांना शक्मय नसते. त्यामुळे शासन दरबारी अनुभव फारसा काही बरा नाही.
प्रश्नः- सरकार, प्रशासन व सर्व सरकारी यंत्रणा मराठी भाषेच्या वापराबाबत आग्रही आहे की नाही?
ः-सरकार दरबारी अंतर्गत पत्रव्यवहार मराठी भाषेमध्ये होतात. पण सभा किंवा अन्य व्यवहार इंग्रजी भाषेमध्ये होतात. मी तामिळनाडूला गेले होते. तेव्हा सरकारी कार्यालयांमध्ये वाहिन्यांवरती फक्त तामिळ भाषेतीलच बातम्या पाहणे बंधनकारक आहे. भाषेचा जाज्वल्य अभिमान ते बाळगतात आणि त्यांची भाषिक अस्मिता इतकी तीव्र आहे की भाषेसाठी ते काहीही करायला तयार असतात. सर्व जण एकच भाषा बोलत असल्याने व्यक्ती कोणत्या धर्माची आहे? हे ओळखताच येत नाही. भाषा जितकी व्यवहारात, वापरात आणाल तितकी ती समृद्ध होते. पाण्याचा जितका उपसा जास्त तितके झरे जिवंत राहतात. भाषेचा उपसा नसेल तर ती शेवाळेल व काही कालांतराने मृतप्राय होईल. अर्थात मराठीला ती भीती नाही. कारण ती स्वतः इतकी सक्षम आहे की ती स्वबळावर अनेक वर्षे जगेल. मात्र तिचं ती बघून घेईल, असे म्हणून आपण हातावर हात ठेवून चालणार नाही.
याशिवाय वाचक कसा वाढेल? दर्जेदार पुस्तकांची निर्मिती कशी होईल? यावर भर द्यायला हवा. किशोरांना रमवेल असे साहित्य फार कमी आहे. मराठी वाचक कमी झाला, असे नक्राश्रू ढाळण्यात अर्थ नाही, कारण ते खरे नाही. दिवाळी अंक पहा, साहित्याची सुबत्ता मराठी इतकी कोठेही नाही. त्यामुळे आपण हिंमत हरायची, आशा सोडण्याची गरज नाही. किशोरवयीन मुलांसाठी साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. वाचन वाढते तसा साहित्याचा संस्कार वाढतो.
प्रश्नः- टी.व्ही. मालिकांमधून एक नवीनच मराठी भाषा पुढे येत आहे ती कितपत व्यवहार्य आहे?
ः-जे समाजात आहे त्याचेच चित्रण मालिकांमध्ये येते. मालिकांत दाखविलेले असते ते समाजामधूनच येते. शुद्ध-अशुद्धतेचा माझा विचार वेगळा आहे. बोली भाषेला सरसकट अशुद्ध म्हणून चालणार नाही. कारण बोली भाषेला त्याचा असा स्वतःचा काही गोडवा आहे, रंग आहे. तो स्वीकारायला यायला हवा. न आणि ण करतो, आलो-गेलो बोलतो. यावरून त्या व्यक्तीचा दर्जा ठरविणे बंद केले तर भाषा अधिक समृद्ध होईल. माझ्या परीने मी माझे आक्षेप नोंदवत असते. भाषेबाबत आपणच उदासीन असतो. ती वाढवावी, असा प्रयत्न आपण करत नाही. त्यामुळे समाजातील भाषा बदलली तर मालिकेतील भाषा नक्कीच बदलेल.
प्रश्नः- मराठी माणूसच मराठी भाषेच्या वापराबद्दल आग्रही नाही असे वाटते का?
ः- हो, आपण बँकेत किंवा कोठेही फॉर्म समोर आला तर भाषेचा पर्याय इंग्रजी निवडतो. भाषा बोजड असेल तर बोली भाषेची मदत घेऊन पर्याय निवडायला हवा. आपण घरातून बाहेर पडताच हिंदी भाषेत बोलायला सुरुवात करतो. त्याऐवजी आपण मराठी भाषेचा आग्रह धरायला हवा. पण आपणच आळशी आहोत, हा आळस सोडून द्यायला हवा.
प्रश्नः- मराठी भाषेचे वैभव टिकवून ठेवणे किंवा तिला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देणे यासाठी आपण काय करू शकतो?
ः-यासाठी आपण मातृभाषेतील एक वृत्तपत्र घ्यायला हवे. ते वाचून त्यावर चर्चा व्हायला हवी. मुलांना घेऊन ग्रंथालयातील वैभव दाखवायला हवे. वस्तूंऐवजी पुस्तकांची भेट द्यायला हवी. मराठी नाटक पाहणे, मराठी कलाकृतींचा आस्वाद घेणे महत्त्वाचे आहे. सहवासाने प्रेम वाढते, मातृभाषेचा सहवास मिळण्यासाठी नाटकांना जाणे, व्याख्याने ऐकणे, वाचन समूह तयार करणे, अभिवाचनाला जाणे असे उपक्रम सतत करत रहायला हवेत. व्यवहारातील जड शब्दांना पर्याय निवडण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम यावर चर्चाही करायला हवी. शासन त्याच्या परीने प्रयत्न करेल, परंतु आपण व्यवहारामध्ये मराठीचा वापर वाढवायला हवा. आवर्जून आपल्या भाषेचा आग्रह धरायला हवा. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून मराठीचे अस्तित्व अबाधित राहील.