प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुक्यात जून महिन्यातील पावसाने आपली मासिक सरासरी ओलांडली आहे. जून महिन्याच्या सुरवातीलाच तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. पण गेल्या आठ दिवसांपासून पाऊस एकदमच गायब झाला असून जुलै महिना सुरु झाला तरी एकप्रकारे उन्हाळी वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस अचानक गायब झाल्याने त्याचा परिणाम तालुक्यातील भात व माळरानावरील पावसाळी पिकांवर झाला असून कधी पाऊस सुरु होतो याकडेच आता शेतकऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या एप्रिल-मे महिन्यात अधूनमधून पडलेल्या पावसामुळे शेतकऱयांनी आपली भात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करुन भाताची पेरणी केली होती. पण यानंतर जून पंधरवडय़ात मुसळधार पाऊस सुरु झाला. यामुळे तालुक्यातील नदी-नाल्यासह शेतीवाडीत पाणीच पाणी झाले. यामुळे उगवलेले भातही पाण्यामुळे खराब झाले. तर काही शेतकऱयांनी भाताच्या रोप लागवडीसाठी तयारी केली होती. पण अचानक पाऊस गायब झाला.गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने एकदमच दडी मारल्याने नदी-नाल्यातील पाण्याची पातळी एकदमच कमी झाली. तसेच शेतीवाडीतील पाणीदेखील गायब होऊन शेतीदेखील कोरडी पडली.
या पूर्वी पेरलेले भात पीक मुसळधार पावसामुळे वाया गेल्याने काही शेतकऱयांनी भाताची दुबार पेरणी केली होती. पण शेतीवाडीत पाणी नसल्याने दुबार पेरणी केलेले भात पिकही उगवणे कठीण झाले आहे. तसेच भात लागवडीसाठी तयार केलेले तरुही वाया गेले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा भात पेरणी कशी करावी, याची आता तालुक्यातील शेतकरी वर्गाला चिंता लागली आहे. तसेच माळरानावरील भुईमूग, बटाटा, मका यासारख्या पिकांचीही झालेली पेरणी मुसळधार पावसामुळे वाया गेली आहे. एकूणच पावसाने अचानक दडी मारल्याने खानापूर तालुक्यातील भात तसेच इतर पावसाळी पिकांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली असून कधी पाऊस पडतो, याची प्रतीक्षा शेतकऱयाकडून केली जात आहे. केवळ 15 ते 20 टक्के शेतकऱयांनाच सध्याचे वातावरण पोषक ठरले आहे.