प्रतिनिधी/कोल्हापूर
ऑलिपिंकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे पैलवान कै.खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार द्यावा अशी मागणी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे शिष्टमंडळाने केली. यावेळी खासदार सहस्त्रबुद्धे यांच्याशी शिष्टमंडळांनी विविध विषयांवर चर्चा केली. शासनस्तरावर होणारी दिरंगाई याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांनी वडीलांना मिळालेले पहिले ऑलिपिंक पदक दाखवले. यावेळी खासदार सहस्त्रबुद्धे यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. तसेच नव्याने निवड झालेल्या राष्ट्रीय कायकारीणीच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा उपस्थित करुन भाजप शासनकाळात खाशाबांना न्याय मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात रणजीत जाधव, पै.संग्राम कांबळे, ऍड.पार्थ शेटे, दौलतराव इंगवले उपस्थित होते.