परतीच्या पावसाचा परिणाम : ऊस उत्पादकांचे दराच्या घोषणेकडे लक्ष
प्रतिनिधी/ संकेश्वर
सीमाभागातील साखर कारखान्यांच्या धुरांडी पेटली आहेत. ऊस मजुरांचे तांडे कारखाना परिसरासह माळभागावर दाखल झाले आहे. ऊस तोडणी-ओढणी सुरू झाली आहे. पण यंदा म्हाणावा तसा हंगामातील उत्साहाला अद्यापही धार आलेली नाही. परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतवाडीत ओल असल्याने अद्याप धिम्म्यागतीने गळीत हंगाम सुरू आहे.
जिल्हय़ातील काही मोजक्याच साखर कारखान्यांनी दराची घोषणा केली आहे. पण बहुतांशी कारखान्यानी दराबद्दल ब्र देखील काढलेला नाही. अन्य कारखाने दर देतील त्याप्रमाणे आपला कारखाना ऊस उत्पादकांना ऊसदर देणार असल्याचे सांगून गाळप हंगामास प्रारंभ करण्यात आला आहे.
अलिकडील काळात उदयास आलेल्या कारखान्यांनी ऊस मिळविण्यासाठी आघाडीचा प्रयत्न चालवला आहे. शिवाय धुरांडी पेटवण्याची घाई करुन पहिल्या टप्प्यातच गाळपास गती देण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर प्रतिष्ठेचे असणाऱया कारखान्यांनी कासवगती गाळप हंगामाची सुरुवात केली आहे. बेळगाव जिल्हय़ासह सीमाभागातील कारखानदारांनी यंदा दराविषयी काही अंशी मौन बाळगून शेतकऱयांस वेठीस धरले आहे. तर याविरोधात कोणत्याही नेत्यांनी किंवा संघटनांनी आवाज उठविलेला नाही.
शेतकऱयाला कारखानदारांनी दिलासा द्यावा
हंगाम सुरु झाल्यामुळे आपला ऊस नतंरच्या काळात वाळू नये या भीतीपोटी ऊस उत्पादकही ऊस तोडणी-ओढणीसाठी दराची हरकत न घेता ऊस पुरवठा करीत आहे. पण दर किती मिळणार याची काळजी लागून राहिली आहे. यंदा सोयाबीन, ज्वारी परतीच्या पावसाने फटका दिला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान शेतकऱयाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कारखानदारांनी योग्य तो दर देत शेतकऱयाला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.