निपाणीचा समग्र विकास साधावा लागणार : प्रशासकीय कारभार सुधारण्याचे दिव्य
वार्ताहर/ निपाणी
तब्बल 26 महिन्यांच्या प्रदीर्घ अशा प्रतिक्षेनंतर निपाणी नगरपालिकेचे सभागृह शनिवारी अस्तित्वात आले. पदाधिकाऱयांच्या निवडणुकीत भाजपाचे जयवंत भाटले यांची नगराध्यक्षपदी तर निता बागडे यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली. या निवडीनंतर भाजपाने प्रथमच नगरपालिकेवर एकहाती सत्तेचा झेंडा उभारला. पण आता पुढील कार्यकाळात या नूतन पदाधिकाऱयांसमोर आव्हानांचा डोंगर असून शहराचा समग्र विकास साधताना प्रशासकीय कारभार सुधारण्याचे दिव्य पार पाडावे लागणार आहे.
संपूर्ण बेळगाव जिल्हय़ात मोठय़ा कार्यक्षेत्रासह अधिक महसूल संकलन करणारी नगरपालिका म्हणून निपाणी नगरपालिकेकडे पाहिले जाते. बहुभाषिक मराठी बांधव असणाऱया या निपाणीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी काळय़ादिनाच्या पार्श्वभूमीवर आधल्या दिवशी भाटले व बागडे यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून या निवडी येणाऱया ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपाला पोषक ठरतील, असा विश्वासही कार्यकर्त्यांतून व्यक्त केला जात आहे.
ओळख निर्माण करावी लागणार
निपाणी नगरपालिकेने अनेक पदाधिकारी अनुभले आहेत. काही पदाधिकाऱयांनी आपल्या पदाच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करताना निपाणीच्या जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. काहींनी पदाच्या माध्यमातून राजकारण करण्याला महत्त्व देत प्रसिद्धीत येण्याला प्राधान्य दिले. बरेचसे पदाधिकारी फक्त पदापुरते मर्यादीत राहण्यातच धन्यता मानले. नूतन पदाधिकारी यामधील कोणत्या पटरीत समाविष्ट होणार हे येता काळच ठरविणार हे निश्चित आहे.
मंत्री, खासदार यांचे पाठबळ
निपाणी नगरपालिकेचा सत्तासंघर्ष पाहता खासदार, आमदार एका पक्षाचे व नगरपालिकेवर सत्ता वेगळीच असे चित्र होते. पण यावेळचे चित्र मात्र वेगळे असून सर्व सत्ता केंद्रे भाजपाकडे एकवटली गेली आहेत. यामुळे एकपात्री सत्तेमुळे जनतेच्या विकासात्मक अपेक्षा वाढणे साहजिक आहे. या सर्व अपेक्षा येणाऱया पाच वर्षात नूतन पदाधिकाऱयांना मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्यातून पूर्ण कराव्या लागणार आहेत.
24 तास पाणी योजना
निपाणी शहरात प्रलंबित असणारी 24 तास पाणी योजना कार्यान्वित करावी लागणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही पाणी योजना पूर्ण करण्यासाठी सभागृह पाठपुरावा करत असले तरी संबंधित कंपन्यांचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. पाणी योजना यशस्वी करण्यासाठी निर्माण त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.
हक्काचे घरकुल मिळण्याची अपेक्षा
निपाणी शहरातील अनेक गरजू गेल्या अनेक वर्षापासून हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी नियमित पाठपुराव्यातून मंजुरी मिळविली आहे. जागेचे सर्व्हे कामही झाले असून कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणे बाकी आहे. गरजू अर्जदारांनी पहिला हप्ता भरणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे सर्व पूर्ण करून गरजूंना हक्काचे घरकुल मिळवून द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर शहरातील रस्ते, गटारी, पार्किंग, अतिक्रमण, वाहतूक कोंडी अशा समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे लागणार आहे.
प्रशासकीय कारभार सुधारावा लागणार
नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराबाबत अनेक तक्रारी आहेत. पैसे दिल्याशिवाय पालिकेत कोणतेच काम होत नाही, असा समज निर्माण झाला आहे. निर्माण झालेली परिस्थिती मोडून काढत पालिकेचा कारभार पारदर्शी होण्यालाही प्राधान्यक्रम देणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही आव्हाने पेलत नूतन पदाधिकाऱयांना आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडावी लागणार आहे.
विरोधकांचे आव्हान
जयवंत भाटले व निता बागडे यांच्याकडे संघटन कौशल्य असल्यानेच पक्षश्रेष्ठींनी पदाची जबाबदारी दिली आहे. सभागृहातील विरोधकांचा अनुभव सत्ताधारी गटापेक्षा अधिक आहे. यामुळे विरोधकांकडून होणारा विरोध सकारात्मकतेतून परतवून लावण्याचे दिव्यही नूतन पदाधिकाऱयांसमोर आहे. अशा या आव्हानांचा डोंगर आणि दिव्य हे नूतन पदाधिकारी कशा पद्धतीने पार पाडणार याकडे शहराच्या नजरा लागल्या आहेत.