उचगाव / वार्ताहर
गेल्या दोन दिवसापासून गांधीनगर (ता.करवीर ) येथील कुमार विद्या मंदिर येथे सुरू असणाऱ्या आरटीपीसीआर व अँटिजेन चाचण्यांच्या तपासणी केंद्रात डाटा ऑपरेटर नसल्याने स्वॅब देणाऱ्या नागरिकांची हेळसांड होत असून संशयित रुग्णांना टेस्ट न करताच परत जावे लागत आहे. या चाचणी यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला असून संबंधित यंत्रणेनेवर जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
एकीकडे शासनाने वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संशयित नागरिकांच्या कोरोना संदर्भातील तपासण्या करून घेण्याचा आग्रह धरला आहे. तर दुसरीकडे तपासणी करणारी यंत्रणाच ठप्प असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. गांधीनगर व्यापारी पेठत नागरिकांचे राहणीमान बरँक पद्धतीचे आहे. गल्लोगल्लीत लोक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे एक संशयित रुग्ण पॉझिटिव्ह आढळला तर अनेक जण त्याच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग वाढण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे येथे आरटिपीसीआर आणि अँटिजेन चाचण्या वाढवण्याची गरज असताना येथे मात्र तपासणी करणारी यंत्रणा ठप्प झाली आहे.
गांधीनगर वसाहत रुग्णालय व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही तपासणी मोहीम सुरू आहे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असून नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायतीचा डाटा ऑपरेटर नसल्याने दोन दिवसापासून या तपासण्या थांबल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना इतर ठिकाणी तपासण्या कराव्या लागत आहेत. नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तपासणी केंद्रात नियमित चाचण्या करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.